Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 15:35 IST2025-06-25T15:34:25+5:302025-06-25T15:35:15+5:30
शेतकऱ्यांनी जमीन मोजणीस विरोध करीत ‘शक्तीपीठ मार्ग रद्द करावा’, अशी मागणी केली. यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.

Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
तामलवाडी (जि. धाराशिव) : नागपूर ते गोवा जोडणाऱ्या शक्तीपीठ मार्गाच्या जमीन संपादनासाठी आलेल्या महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांसमोर संयुक्त जमीन मोजणीवेळी पोलिस व शेतकऱ्यांत झटापट झाली. यात सहा शेतकऱ्यांसह एक पोलिस अधिकारी व दोन कर्मचारी देखील किरकोळ जखमी झाले. ही घटना तुळजापूर तालुक्यातील वाणेवाडी शिवारात बुधवारी सकाळी साडेदहा वाजता घडली. संयुक्त जमीन मोजणी विरोधावर शेतकरी ठाम असल्याने अखेर प्रशासनाला मोजणी प्रक्रिया थांबवावी लागली.
नागपूर ते गोवा हा शक्तीपीठ राष्ट्रीय महामार्ग तुळजापूर तालुक्यातील वाणेवाडी, खुंटेवाडी, महसूल विभागातील गावच्या शिवारातून मार्गस्थ होत आहे. यासाठी भूसंपादनाच्या कार्यवाही महसूल प्रशासनाने हाती घेतली आहे. मंगळवारी वाणेवाडी शिवारातील गट नं. २४३ मधील जमीन मोजणी उप विभागीय अधिकारी देशमुख यांच्या उपस्थितीत करण्यात येणार होती. मात्र, यावेळी वाणेवाडी, शेळगाव, खुंटेवाडी, रुई आदी गावच्या शेतकऱ्यांनी जमीन मोजणीस विरोध करीत ‘शक्तीपीठ मार्ग रद्द करावा’, अशी मागणी केली. यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.
शेतकरी व पोलिसांत बाचाबाची
दरम्यान, बुधवारी पुन्हा प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी संयुक्त मोजणीसाठी दाखल झाले. उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्या उपस्थितीत ही कार्यवाही करण्यात येत होती. दरम्यान, विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने शेतकरी व पोलिसांत बाचाबाची सुरू झाली. यावेळी झालेल्या झटापटीत भाजपा तालुकाध्यक्ष महादेव जाधव, दत्तात्रय सावंत, प्रदीप जाधव, गणेश जाधव, माणिक गायकवाड, दिलीप शिरसट हे सहा शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. याशिवाय एक पोलिस अधिकारी व दोन कर्मचारीही किरकोळ जखमी झाले. याच वेळी शेतकरी दत्तात्रय सावंत यांना मायनर अटॅक आल्याने, ते जमिनीवर कोसळले. ‘शेतातून पोलिस व प्रशासनाचे अधिकारी निघून जात नाहीत तोवर उपचारासाठी दवाखान्यात जाणार नाही’ अशी भूमीका या शेतकऱ्याने घेतली आहे.
आम्हाला शक्तीपीठ मार्ग नकोच
खुंटेवाडी, काटी गावच्या शिवारातून यापूर्वीच सुरत-चेन्नई राष्ट्रीय महामार्ग गेला आहे, त्यासाठी जमिनी संपादीत झाल्या आहेत. आता पुन्हा शक्तीपीठ मार्गासाठी जमीन घेतल्यास शेतकऱ्यांकडील जमिनीचे क्षेत्र आणखी कमी होईल. यामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल, अशी भीती व्यक्त करत शेतकऱ्यांनी 'शक्तीपीठ मार्गच रद्द करा' या मागणीवर ठाम असल्याचे सांगितले.
तगडा बंदोबस्त
शक्तीपीठ मार्गाच्या भूसपांदनास शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तामलवाडी पोलिस ठाण्याच्या वतीने ३० पोलिस कर्मचारी, ४ अधिकारी वाणेवाडी शिवारात बंदोबस्तासाठी आले होते. बार्शी, तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनीही मोजणी ठिकाणी मोठी गर्दी केली होती.