शेताकडे जाताना काळाचा घाला; उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला दुचाकीची धडक, दोन तरुण जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 11:18 IST2026-03-16T11:17:49+5:302026-03-16T11:18:15+5:30
धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा समोरील भाग पूर्णतः चक्काचूर झाला.

शेताकडे जाताना काळाचा घाला; उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला दुचाकीची धडक, दोन तरुण जागीच ठार
धाराशिव/कारी : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर दुचाकी जोरात आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास खानापूर गावाजवळ घडली. मृतांमध्ये धाराशिव येथील एका २० वर्षीय तरुणाचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव येथील दोन तरुण आपल्या दुचाकीवरून (क्र. एमएच २५-बीडी. ८२८१) आंबेजवळगा येथील स्वतःच्या शेताकडे जात होते. दुपारी तीनच्या सुमारास त्यांची दुचाकी खानापूर गावापासून साधारण अर्धा किलोमीटर अंतरावर पोहोचली असता, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रॅक्टर ट्रॉलीवर पाठीमागून आदळली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा समोरील भाग पूर्णतः चक्काचूर झाला.
या अपघातात दुचाकीवरील दोन्ही तरुणांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील मृतांपैकी एकाची ओळख पटली असून, रणवीर अभिषेक बागल (वय २०, रा. धाराशिव) असे त्याचे नाव आहे. दुसऱ्या मृत तरुणाची ओळख रात्री उशिरापर्यंत पटवण्याचे काम अद्याप सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत.