संसाराची स्वप्ने पाहण्यापूर्वीच स्मशानशांतता! साखरपुडा होऊन ४ दिवस झाले अन् लातूरला परीक्षेला जाताना घात झाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 18:34 IST2026-02-23T18:34:09+5:302026-02-23T18:34:26+5:30
साखरपुड्याची मेहंदी सुकण्यापूर्वीच ‘अक्षय-अक्षया’चा शेवट; परीक्षेला जाताना भीषण अपघातात अंत

संसाराची स्वप्ने पाहण्यापूर्वीच स्मशानशांतता! साखरपुडा होऊन ४ दिवस झाले अन् लातूरला परीक्षेला जाताना घात झाला
- सचिन बारकुल
येरमाळा (जि. धाराशिव) : ज्या घरांत चार दिवसांपूर्वी लग्नाची सनई वाजणार म्हणून आनंदाचे वातावरण होते, तिथे आज शोककळा पसरली आहे. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर रत्नापूर पाटीजवळ रविवारी पहाटे झालेल्या एका भीषण कार अपघातात वाशी तालुक्यातील नुकताच साखरपुडा झालेल्या (नियोजित) वधू-वरांचा जागीच मृत्यू झाला. मृत तरुणी आपल्या करिअरसाठी महत्त्वाची असलेली परीक्षा देण्यासाठी निघाली होती. मात्र वाटेतच काळाने त्यांच्यावर झडप घातली.
मिळालेल्या माहितीनुसार, वाशी तालुक्यातील पारा येथील अक्षय रामभाऊ शिनगारे (२५) आणि वाशी येथील अक्षया सुनील चव्हाण (२३) यांचा साखरपुडा अवघ्या चार दिवसांपूर्वी, म्हणजेच मांजरसुंबा येथील एका मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला होता. अक्षयाची आज लातूर येथे महापारेषणची परीक्षा होती. ही परीक्षा देण्यासाठी अक्षय आणि अक्षया पहाटेच आपल्या कारने क्र. (एमएच २५ बीएफ ५०६४) वाशी येथून लातूरकडे निघाले होते. सकाळी ६ च्या सुमारास रत्नापूर पाटीजवळील वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव कार थेट येडशी टोल वेच्या लोखंडी कमानीला जाऊन धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की, कारच्या समोरील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात अक्षया चव्हाण आणि अक्षय शिनगारे या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. कार चालवणारा अक्षय यादव सिरसट (२२) हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नागरिकांची मदतीसाठी धाव
अपघाताचा आवाज ऐकताच रत्नापूर येथील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी चालकाला बाहेर काढून १०८ रुग्णवाहिकेमार्फत उपचारासाठी पाठवले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येरमाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले.
वाशी तालुक्यात हळहळ
लग्नाचे स्वप्न डोळ्यासमोर असताना आणि आयुष्याची नवी सुरुवात करण्यापूर्वीच या जोडप्याचा अशाप्रकारे अंत झाल्याने संपूर्ण वाशी तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. एकीकडे परीक्षेची तयारी आणि दुसरीकडे संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या या तरुणीच्या अकाली जाण्याने परिसरात शोककळा पसरली आहे.