भाविकांनो लक्ष द्या! चैत्र पौर्णिमा उत्सवासाठी तुळजाभवानी मंदिरात तीन दिवस 'VIP' एन्ट्री बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 19:46 IST2026-03-28T19:45:19+5:302026-03-28T19:46:24+5:30
मंदिर संस्थानचा मोठा निर्णय, सामान्य भाविकांना सुलभ दर्शनासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय!

भाविकांनो लक्ष द्या! चैत्र पौर्णिमा उत्सवासाठी तुळजाभवानी मंदिरात तीन दिवस 'VIP' एन्ट्री बंद
तुळजापूर (धाराशिव) : कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचा चैत्र पौर्णिमा उत्सव येत्या ३० मार्चपासून सुरू होत आहे. या उत्सवाच्या निमित्ताने तुळजापूर नगरीत होणारी भाविकांची अभूतपूर्व गर्दी लक्षात घेऊन मंदिर संस्थानने दर्शन व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. भाविकांना सुलभ आणि जलद दर्शन मिळावे यासाठी ३१ मार्च ते २ एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत ५०० रुपयांचे व्हीआयपी (VIP) आणि २०० रुपयांचे रेफरल पास पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
यंदाचा हा उत्सव ३० मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत संपन्न होत असून, त्यानंतर लगेचच सार्वजनिक सुट्ट्या येत असल्याने ५ एप्रिलपर्यंत भाविकांचा ओघ कायम राहण्याची शक्यता आहे. सामान्य भाविकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागू नये, यासाठी मंदिर प्रशासनाने हा धाडसी निर्णय घेतला आहे.
दर्शन व्यवस्थेतील नवे बदल आणि 'पेड पास'
मंदिर संस्थानच्या व्यवस्थापक तथा तहसीलदार माया माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, या तीन दिवसांच्या कालावधीत केवळ २०० रुपयांचा 'पेड पास' (Paid Pass) सुरू राहणार आहे. हे पेड पासधारक 'बिडकर तलाव पायरी' मार्गे मंदिरात प्रवेश करू शकतील. याच मार्गावरून अभिषेक पास, धर्मदर्शन आणि मुखदर्शन या रांगांचेही नियोजन करण्यात आले आहे. यामुळे विविध मार्गांनी येणाऱ्या गर्दीचे योग्य व्यवस्थापन करणे प्रशासनाला सोपे जाणार आहे.
भाविकांना दिलासा आणि प्रशासनाचे आवाहन
व्हीआयपी आणि रेफरल पासमुळे सामान्य भाविकांच्या रांगेवर येणारा ताण कमी करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. या निर्णयामुळे सर्वांना समान पद्धतीने आणि कमी वेळेत देवीचे दर्शन घेता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर परिसरात चोख पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. भाविकांनी आणि स्थानिक पुजारी बांधवांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार माया माने यांनी केले आहे.