अणदूर : तुळजापूर तालुक्यातील अणदूर ते आरळी व येवतीला जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे संबंधित रस्त्यांवरून पायी चालणे कठीण झाले आहे. खड्डेमय रस्त्यामुळे विद्यार्थी, ग्रामस्थांसह शेतकरी हैराण झाले आहेत.
अणदूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व अन्य खासगी दवाखाने असल्यामुळे रात्री-बेरात्री चिवरी, आरळी, येवती येथील रुग्णांना अणदूर गाठावे लागत. मात्र, रस्त्याची दुरवस्था झाल्याने रुग्णांना आजाराच्या वेदनेसाेबतच खड्डेमय रस्त्याचाही त्रास साेसावा लागताे. दरम्यान, अणदूर येथे मोठी बाजारपेठ, शाळा, महाविद्यालय असल्याने परिसरातील खेडाेपाडीचे विद्यार्थी, शेतकरी तसेच अन्य नागरिकांची ये-जा असते. एवढेच नाही तर श्री महालक्ष्मीचे मंदिर चिवरी येथे असल्याने राज्यभरातील भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांसाेबतच भाविकांनाही खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. उपराेक्त प्रश्न लक्षात घेऊन चिवरी ग्रामपंचायतीने सप्टेंबर २०२० मध्ये जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला. दाेनवेळा पत्रही दिले. परंतु, त्याचा काहीच फायदा झाला नाही. दरम्यान, सदरील खड्डेमय रस्त्यामुळे आरळी, चिवरीमार्गे अणदूरला जाणारी बस बंद झाली आहे.
काेट...
गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्त्याची अवस्था फारच वाईट झाली आहे. अणदूर ते चिवरी, आरळी, येवती रस्त्याची दुरवस्था पाहता सप्टेंबर २०२० मध्ये जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला हाेता. मात्र, आमच्या अर्जाला केराची टाेपली दाखविली गेली.
- अशोक पाटील, सरपंच, चिवरी.