तामलवाडी - तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील बालाजी अमाईन्स या कंपनीने सामाजिक बांधिलकी जपत ‘सीएसआर’ फंडातून सुमारे १ काेटी रुपयांची मदत गुरुवारी मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी दिली. मदतीचा धनादेश कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी यांच्या हस्ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी बालाजी अमाईन्स कंपनीचे कौतुक करून आभार मानले. सध्याच्या संकटकालीन परिस्थितीत उद्योगांनी मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. व्यवस्थापकीय संचालक रेड्डी यांनी सांगितले की, बालाजी अमाईन्सने ‘सीएसआर’ अंतर्गत शिक्षण, क्रीडा, आरोग्य व स्वछता, पाणीपुरवठा व जलसंवर्धन नाला खोलीकरण आदी क्षेत्रांत कंपनीच्या वतीने योगदान दिले आहे. इतकेच नव्हे तर राष्ट्रीय आपत्ती असो वा शहीद जवानांच्या कुटुंबीयांना आधार अथवा कोरोनाच्या महामारीच्या संकटात कंपनीने नेहमीच समाजाच्या मदतीसाठी अग्रेसर राहिली आहे. अखंडपणे सामाजिक दायित्व जपण्याचा मनोदय त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी बालाजी अमाईन्सचे समन्वयक विनोद चुंगे हेही उपस्थित हाेते.