यवतमाळमध्ये थरार! भररस्त्यावर हत्येचा प्रयत्न, पाठीत चाकू खुपसलेल्या अवस्थेत तरुण पोहोचला रुग्णालय
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 20:12 IST2026-03-20T20:12:33+5:302026-03-20T20:12:33+5:30
यवतमाळमध्ये एका तरुणावर भररस्त्यात हल्ला करण्यात आल्याने खळबळ उडाली.

यवतमाळमध्ये थरार! भररस्त्यावर हत्येचा प्रयत्न, पाठीत चाकू खुपसलेल्या अवस्थेत तरुण पोहोचला रुग्णालय
Yavatmal Crime: यवतमाळ शहरात वाढती गुन्हेगारी गंभीर समस्या बनली आहे. अमली पदार्थांचा नशा करून फिरणारे अल्पवयीन धोकादायक बनले आहेत. यातूनच बुधवारी रात्री शहरातील आर्णी मार्गावर राणा प्रताप गेट येथे दोघांनी एकावर थेट चाकूने हल्ला केला. हा चाकू पाठीत खुपसल्याने अडकला, त्यामुळे जीव वाचला. अशा स्थितीत जखमी थेट शासकीय रुग्णालयात पोहोचला. दुखापत गंभीर नसल्याने पोलिसांनी या प्रकरणाची तीव्रताच कमी करून टाकली. साधा मारहाणीचा गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकारामुळे हल्लेखोरांना एक प्रकारे बळ देण्याचेच काम अवधूतवाडी पोलिसांकडून होत असल्याची चर्चा शहरात आहे.
तुषार गजानन सोळंके (१९) असे जखमी युवकाचे नाव आहे. तो आणि त्याचा मित्र कार्तिक कुडमेथे हे दुचाकीवरून जात असताना त्यांना मागून आलेल्या दोघांनी आवाज देऊन थांबवले. जुना वाद उकरून काढत त्या दोघांनी कार्तिक सोबत वाद घालण्यास सुरुवात केली. भीतीने कार्तिक तेथून पळून गेला, तर तुषार तेथेच उभा होता. कार्तिकचा राग त्या दोघांनी तुषारवर काढला. चाकूने थेट तुषारच्या पाठीत वार केला. चाकू त्याच्या पाठीतच अडकला, तो बाहेर न आल्याने हल्लेखोर मुलांना तेथून पळ काढला. जखमी तुषार पाठीत चाकू खुपसलेल्या अवस्थेत शासकीय रुग्णालयात पोहोचला. वर्दळीच्या ठिकाणी हा हल्ला झाल्याने घटनेचे फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात तुषार सोळंके याने दिलेल्या तक्रारीवरून दोघांवर अवधूतवाडी पोलिसांनी कलम ११८(२)३ (५) बीएनएसनुसार मारहाणीचा गुन्हा दाखल केला. थेट चाकून हल्ला जीवघेण्या प्रकारात मोडणार आहे. मात्र, त्यानंतरही अवधूतवाडी पोलिसांनी त्या हल्लेखोरावर विशेष दया दाखविल्याचे या प्रकरणातून दिसून येते.
अनेक प्रकरणांत साधी इजाही झालेली नसताना जिवाने मारण्याच्या उद्देशानेच हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करून वचक निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. इथे मात्र केवळ चाकू पाठीत खुपसून राहिला, तो हल्लेखोरांना बाहेर काढता आला नाही म्हणून जखमीवर आणखी वार करता आले नाही. याच कारणाने जखमीचा जीव वाचला. त्यानंतरही गुन्ह्याची तीव्रता कमी करण्यात आल्याचे दिसून येते. चारचौघात चाकूने वार करून साध्या सूचनापत्रावर हल्लेखोर सुटणार असल्याने त्यांना पुढच्या वेळी यापेक्षा मोठा गुन्हा करण्याची संधीच पोलिसांनी दिल्याचे बोलले जात आहे.