१८ वर्षांनीही सुधारला नाही,मुलांची हत्या करणाऱ्या हैवानाने मदत करणाऱ्या महिलेला संपवलं, शेवट धक्कादायक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 14:44 IST2026-02-17T14:33:00+5:302026-02-17T14:44:10+5:30
भोपाळमध्ये मुलांची हत्या करणाऱ्या आरोपीने आणखी एका महिलेला संपवलं.

१८ वर्षांनीही सुधारला नाही,मुलांची हत्या करणाऱ्या हैवानाने मदत करणाऱ्या महिलेला संपवलं, शेवट धक्कादायक
Bhopal Crime: मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. आपल्या तीन सख्ख्या मुलांची कुऱ्हाडीने हत्या करून १८ वर्षे तुरुंगवास भोगून आलेल्या एका नराधमाने हादरवणारे कृत्य केलं. आरोपीने बाहेर आल्यावर ज्या महिलेने त्याला आश्रय दिला, तिचीच क्रूरपणे हत्या केली. या भीषण हत्याकांडानंतर आरोपीने स्वतःही रेल्वेखाली उडी मारून जीवनयात्रा संपवली आहे.
भोपाळमधील गौतम नगर परिसरात ही थरारक घटना घडली. ५० वर्षीय दुर्गा नावाच्या महिलेची तिच्याच घरात अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. आरोपी प्रीतम कुशवाह हा दुर्गा यांचा नातेवाईक आणि एकाच गुरुचा शिष्य होता. १८ वर्षे तुरुंगात काढून आल्यावर गावात बहिष्कार टाकलेल्या प्रीतमला दुर्गा यांनी माणुसकी दाखवत आपल्या घरी आश्रय दिला होता. मात्र, हीच माणुसकी त्यांच्या जीवावर बेतली.
१३ वार आणि क्रूरतेचा कळस
मिळालेल्या माहितीनुसार, प्रीतमने दुर्गा यांना घराच्या साफसफाईच्या बहाण्याने बांधकाम सुरु असलेल्या भागात नेले आणि तिथे त्यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. पोस्टमार्टम रिपोर्ट आणि प्राथमिक तपासातून समोर आले आहे की, आरोपीने दुर्गा यांच्यावर एकूण १३ वेळा वार केले. ९ वार थेट छातीवर करण्यात आले. ३ वार पोटावर आणि १ वार मानेवर करण्यात आला. या हल्ल्यात दुर्गा यांचा जागीच मृत्यू झाला.
हत्येमागचे धक्कादायक कारण
पोलीस तपासात समोर आले की, प्रीतम गेल्या एक वर्षापासून दुर्गा यांच्या घरी राहत होता. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून दुर्गा या त्याला घर सोडून जाण्यासाठी सांगत होत्या. याच गोष्टीचा राग प्रीतमच्या मनात होता. त्याने दोन दिवसांपूर्वीच आपली भाजी विकण्याची गाडी विकली होती, ज्यावरून त्याने या हत्येचा कट आधीच रचला असावा, असा संशय पोलिसांना आहे.
पोटच्या पोरांचाही घेतला होता बळी
आरोपी प्रीतम कुशवाह हा सराईत गुन्हेगार होता. याआधी त्याने आपल्या तीन सख्ख्या मुलांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली होती. या प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती आणि १८ वर्षे तुरुंगात राहून तो गेल्या वर्षीच बाहेर आला होता. तुरुंगातून सुटल्यावर समाजाने त्याला नाकारले होते, तेव्हा दुर्गा यांनी त्याला आसरा दिला होता.
हत्येनंतर आरोपीची आत्महत्या
दुर्गा यांची हत्या केल्यानंतर प्रीतमने तिथून पळ काढला. मात्र, काही वेळाने निशातपुरा परिसरात त्याने रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.