जिमवाली 'परफेक्ट बॉडी' ठरली मृत्यूचं कारण! रागाच्या भरात स्वतःला मारलं अन् बॉडिबिल्डरचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 14:03 IST2026-03-27T13:39:56+5:302026-03-27T14:03:04+5:30
उत्तर प्रदेशात एका बॉडी बिल्डरचा धक्कादायकरित्या मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

जिमवाली 'परफेक्ट बॉडी' ठरली मृत्यूचं कारण! रागाच्या भरात स्वतःला मारलं अन् बॉडिबिल्डरचा मृत्यू
Meerut Bodybuilder Death: नेहमीच लोक सुडौल आणि पिळदार शरीरयष्टी मिळवण्यासाठी जिममध्ये तासनतास घाम गाळतात. पण मेरठमधील २८ वर्षीय सलमान नावाच्या तरुणासाठी त्याची हीच फिट बॉडी मृत्यूचे कारण बनली. रागाच्या भरात स्वतःच्या जांघेत चाकू खुपसल्यानंतर, शरीरावर चरबी नसल्यामुळे जखम थेट मुख्य नसेपर्यंत पोहोचली आणि या बॉडिबिल्डरचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मेरठच्या लावड परिसरात राहणारा सलमान एक व्यावसायिक बॉडिबिल्डर होता आणि स्वतःचा पोल्ट्री फार्म चालवत होता. गुरुवारी सकाळी सलमान आपल्या खोलीत मुलांसोबत असताना, त्याचा मोठा भाऊ इमरान याच्याशी फोनवर कोणत्यातरी कारणावरून जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की संतापाच्या भरात सलमानने जवळच असलेला भाजी कापण्याचा चाकू उचलला आणि स्वतःच्या जांघेवर एकामागून एक वार केले.
फिटनेस कसा ठरला जीवघेणा?
सलमानने चाकू मारताच रक्ताची धार लागली. कुटुंबीयांनी त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात नेले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमानच्या शरीरावर चरबीचा थर अजिबात नव्हता आणि त्याच्या स्नायू अत्यंत कडक होते. जर सलमानच्या शरीरावर थोडी जरी चरबी असती, तर चाकू इतका खोलवर गेला नसता. मात्र, जराही फॅट नसल्यामुळे चाकू थेट हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या मुख्य नसेला लागला. यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला आणि त्याला वाचवणे शक्य झाले नाही.
सोशल मीडिया स्टार आणि चॅम्पियन
सलमानला बॉडिबिल्डिंगची प्रचंड आवड होती. त्याने अनेक स्पर्धा जिंकल्या होत्या आणि तो सोशल मीडियावरही आपले वर्कआउट व्हिडिओ शेअर करायचा. गेल्या काही दिवसांपासून तो अॅब्स बनवण्यासाठी विशेष डाएट आणि वेट लॉस करत होता, ज्यामुळे त्याच्या शरीरातील फॅटचे प्रमाण अत्यंत कमी झाले होते.
हसते-खेळते कुटुंब उध्वस्त
४ वर्षांपूर्वीच सलमानचे लग्न मुजफ्फरनगरच्या आयशाशी झाले होते. त्याला एक वर्षाची मुलगी आणि एक मुलगा आहे. एका क्षणाच्या रागाने पोटच्या दोन चिमुकल्यांच्या डोक्यावरचे वडिलांचे छत्र हिरावून घेतले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून प्राथमिक दृष्ट्या हा रागाच्या भरात उचललेले टोकाचे पाऊल असल्याचे दिसत आहे.