भिंतीवर ते शब्द अन् मनात अघोरी विद्या! मनीषने पोटच्या लेकरांना का दिले विष? मथुरेतील मिस्ट्रीने पोलीसही चक्रावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 15:10 IST2026-02-10T15:09:15+5:302026-02-10T15:10:17+5:30
मृत मनीष हा एका बाबाच्या संपर्कात होता आणि तो गुप्त विद्या शिकत होता, असा खळबळजनक खुलासा त्याच्या भावाने केला आहे.

भिंतीवर ते शब्द अन् मनात अघोरी विद्या! मनीषने पोटच्या लेकरांना का दिले विष? मथुरेतील मिस्ट्रीने पोलीसही चक्रावले
मथुरेच्या खप्परपूर गावात एकाच कुटुंबातील पाच सदस्यांनी केलेल्या सामूहिक आत्महत्येच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. सुरुवातीला हे केवळ आत्महत्येचे प्रकरण वाटत असतानाच, आता यात तंत्र-विद्या आणि अघोरी प्रथेचा धक्कादायक ट्विस्ट समोर आला आहे. मृत मनीष हा एका बाबाच्या संपर्कात होता आणि तो गुप्त विद्या शिकत होता, असा खळबळजनक खुलासा त्याच्या भावाने केला आहे. या माहितीनंतर पोलिसांनी एका संशयास्पद तांत्रिकाला ताब्यात घेतले आहे.
सुखी संसार अन् आर्थिक संपन्नता, तरीही मृत्यूचा विळखा का?
मृत मनीषच्या चुलत भावाने, अमित कुमारने दिलेल्या माहितीनुसार, मनीषचा स्वभाव अतिशय आनंदी होता आणि कुटुंबाची आर्थिक स्थितीही उत्तम होती. त्यांच्यावर कोणतेही कर्ज किंवा पैशांची चणचण नव्हती. "मनीष गेल्या काही काळापासून एका बाबाकडून तंत्र-मंत्राचे धडे गिरवत होता," असे अमितने सांगितले. त्यामुळे, कोणत्याही आर्थिक विवंचनेऐवजी एखाद्या अंधश्रद्धेतून किंवा अघोरी अनुष्ठानाच्या नादात तर हे टोकाचे पाऊल उचलले गेले नाही ना? अशी भीती व्यक्त होत आहे.
भिंतीवर सुसाईड नोट अन् अखेरचा व्हिडिओ
घटनेच्या ठिकाणी तपास केला असता, मनीषने घराच्या भिंतीवर एक सुसाईड नोट लिहिली होती. त्यात म्हटले होते की, 'आम्ही आमच्या मर्जीने आत्महत्या करत आहोत.' मात्र, पोलीस याला केवळ सुसाईड नोट मानण्यास तयार नाहीत. मनीषने मृत्यूपूर्वी एक व्हिडिओ देखील रेकॉर्ड केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने काही गुपिते सांगितली आहेत का, याचा तपास आता फॉरेन्सिक टीम करत आहे.
तांत्रिकाच्या अटकेने खळबळ
मथुरेचे एसएसपी श्लोक कुमार सिंह यांनी सांगितले की, तंत्र-विद्येचा अँगल समोर आल्यानंतर पोलिसांनी एका संशयित तांत्रिकाला ताब्यात घेतले आहे. मनीषला या तांत्रिकाने काही विशिष्ट सिद्धी मिळवण्याचे आमिष दाखवले होते का? किंवा संपूर्ण कुटुंबाचा बळी दिल्यास काहीतरी मोठे साध्य होईल, असा भ्रम त्याच्या मनात पेरला होता का? या दिशेने आता पोलीस कसून चौकशी करत आहेत.
मृत्यूचा 'तो' थरार...
सोमवारी रात्री मनीष आणि त्याची पत्नी सीमा यांनी आपल्या तीन चिमुकल्या मुलांना (एक मुलगा, दोन मुली) दुधात विष मिसळून पाजले आणि त्यानंतर स्वतःही ते प्राशन केले. मंगळवारी सकाळी उशिरापर्यंत दरवाजा न उघडल्याने शेजाऱ्यांनी आत डोकावून पाहिले, तेव्हा संपूर्ण कुटुंब मृतावस्थेत आढळले.