मुली नापास नव्हत्याच, मग वडिलांनी खोटं का सांगितलं? 'कोरियन लव्ह गेम' प्रकरणाला धक्कादायक वळण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 13:57 IST2026-02-12T13:53:56+5:302026-02-12T13:57:21+5:30
'कोरियन लव्ह गेम' प्रकरणाच्या तपासात आता असे काही तथ्य समोर येत आहेत, ज्यामुळे संशयाची सुई थेट मुलींच्या वडिलांकडे वळली आहे.

मुली नापास नव्हत्याच, मग वडिलांनी खोटं का सांगितलं? 'कोरियन लव्ह गेम' प्रकरणाला धक्कादायक वळण!
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील भारत सिटी सोसायटीत तीन अल्पवयीन बहिणींनी केलेल्या सामूहिक आत्महत्येने संपूर्ण देश हादरला आहे. मात्र, या प्रकरणाच्या तपासात आता असे काही तथ्य समोर येत आहेत, ज्यामुळे संशयाची सुई थेट मुलींच्या वडिलांकडे वळली आहे. "माझ्या मुली परीक्षेत नापास झाल्यामुळे तणावात होत्या आणि त्यांनी टोकाचे पाऊल उचलले," असा दावा करणाऱ्या वडिलांचा खोटेपणा आता उघड झाला आहे.
शाळेच्या रेकॉर्डने वडिलांचा दावा खोडला
या घटनेनंतर मुलींचे वडील चेतन यांनी पोलिसांना सांगितले होते की, तिन्ही मुली परीक्षेत नापास झाल्यामुळे मानसिक दबावाखाली होत्या आणि त्यांनी शाळेत जाणेही बंद केले होते. बुधवारी जेव्हा पोलीस तपास करत मुलींच्या शाळेत पोहोचले, तेव्हा सत्य काही वेगळेच निघाले. शालेय रेकॉर्डनुसार, कोरोना काळात तिन्ही मुलींनी परीक्षा दिल्या होत्या आणि त्या चांगल्या गुणांनी उत्तीर्णही झाल्या होत्या. इतकेच नाही तर त्यांना पुढच्या वर्गात प्रवेशही मिळाला होता. मग प्रश्न असा उपस्थित होतोय की, जर मुली पास होत्या, तर वडिलांनी त्या नापास झाल्याची खोटी गोष्ट का रचली?
वडिलांचे वैयक्तिक आयुष्य आणि संशयाचा फेरा
तपासादरम्यान वडील चेतनच्या खासगी आयुष्याबाबत अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. चेतनने एक-दोन नव्हे तर तब्बल तीन लग्ने केली आहेत. धक्कादायक म्हणजे, त्याच्या एका 'लिव्ह-इन पार्टनर'चा इमारतीच्या छतावरून पडून मृत्यू झाल्याचीही जुनी घटना समोर आली आहे. आपल्या कौटुंबिक परिस्थितीबद्दल चेतनने दिलेली माहिती आणि वास्तव यात जमीन-अस्मानाचा फरक असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आहे.
यूट्यूब चॅनलचे कनेक्शन काय?
तपासात आणखी एक माहिती समोर आली आहे की, या तिन्ही बहिणी आपल्या वडिलांच्या मोबाईलवरून एक यूट्यूब चॅनल चालवत होत्या. या चॅनलवर त्या कशा प्रकारचे व्हिडिओ पाहत होत्या किंवा अपलोड करत होत्या, याचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच, या घटनेमागे केवळ एखादा ऑनलाइन गेम कारणीभूत आहे की घरातील सततचे कलह आणि वडिलांचा दबाव, याचाही कसून तपास केला जात आहे.
पोलिसांसमोर अनेक प्रश्न
- मुलींनी शाळा का सोडली? हा त्यांचा स्वतःचा निर्णय होता की त्यांना जबरदस्तीने बसवण्यात आले?
- वडिलांनी आत्महत्येचे कारण 'नापास होणे' असे का सांगितले?
- घरातील वातावरण आणि वडिलांच्या अनेक लग्नांचा मुलींच्या मानसिकतेवर काय परिणाम झाला होता?
गाझियाबाद पोलीस आता चेतनच्या नातेवाईकांची आणि शेजाऱ्यांची चौकशी करून या रहस्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न करत आहेत. वडिलांच्या प्रत्येक दाव्यामध्ये गोंधळ असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.