चार मुलांच्या आईचा ३० वर्षांचा बॉयफ्रेंड, लग्न करण्यासाठी सुनांचे दागिने घेऊन महिला झाली गायब!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 12:11 IST2025-06-02T12:10:18+5:302025-06-02T12:11:38+5:30
प्रेमाला वयाचं बंधन नसतं असं म्हणतात. पण, प्रेमासाठी संसार उधळून लावल्याची अनेक प्रकरणे सध्या समोर येत आहेत.

चार मुलांच्या आईचा ३० वर्षांचा बॉयफ्रेंड, लग्न करण्यासाठी सुनांचे दागिने घेऊन महिला झाली गायब!
प्रेमाला वयाचं बंधन नसतं असं म्हणतात. पण, प्रेमासाठी संसार उधळून लावल्याची अनेक प्रकरणे सध्या समोर येत आहेत. आता उत्तर प्रदेशच्या ललितपुरमधून देखील एक असेच प्रकरण समोर आले आहे. याच भागात राहणारी एक वयस्कर महिला तिच्या ३० वर्षांच्या प्रियकरासोबत पळून गेली. इतकंच नाही तर, जाताना तिने आपल्या चारही सुनांचे दागिने देखील सोबत नेले. सध्या ही प्रकरण आजूबाजूच्या परिसरांत चांगलेच चर्चेत आले आहे.
चार मुलगे आणि चार सुना असा मोठा परिवार!
उत्तर प्रदेशच्या बुंडेलखंडमधील ललितपुर भागातील जखौरा गावात ही घटना घडली आहे. या गावात राहणाऱ्या एका महिलेला चार मुलगे असून, त्या चारही जणांची लग्न झालेली आहेत. घरात चार सुना असणारी ही महिला एका ३० वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली आणि घरातून पळून गेली. घरातून पळून जाताना ही महिला आपल्यासोबत चारही सुनांचे स्त्रीधन अर्थात सगळे दागिने घेऊन पसार झाली. पीडित कुटुंबाने या संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांनी या प्रकरणी कोणतीही कारवाई केली नाही. यामुळे आता पीडित कुटुंबाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून मदत मागितली आहे.
कुटुंबाचं मुख्यमंत्र्यांना पत्र
या संदर्भात माहिती देताना महिलेच्या पतीने सांगितले की, आमचा संसार सोडून माझी पत्नी ३० वर्षांच्या एका तरुणासोबत घरातून पळून गेली. गेल्या २० दिवसांपासून आम्ही त्यांचा शोध घेत आहोत. मात्र, काहीच ठिकाणा कळत नाहीये. आम्ही पोलिसांकडे या बाबत तक्रार नोंदवली असून, त्यांनीही यात कोणती कारवाई केलेली नाही.
पोलिसांनी कोणतीच कारवाई न केल्याने आता कुटुंबाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून आपल्या वेदना सांगितल्या आहेत. आपल्या परिवाराला न्याय मिळावा, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. दुसरीकडे, ३० वर्षांचा तरुण देखील आधीच विवाहित असून, त्याच्या या कृत्यामुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. माझ्या पतीला शोधून आणा, अशी मागणी त्या तरुणाच्या पत्नीने केली आहे. या प्रकारामुळे समाजात आपली बदनामी होत असल्याचे, दोन्ही कुटुंबांनी म्हटले आहे.