संशयाने घेतला बळी! भावासोबत बाजारात गेलेल्या तरुणीला होण्याऱ्या नवऱ्याने केलं अपमानित; उचललं टोकाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 13:04 IST2026-03-18T13:03:42+5:302026-03-18T13:04:23+5:30
आपल्या चुलत भावासोबत बाजारात गेलेल्या सानिया नावाच्या तरुणीला तिच्याच होणाऱ्या पतीने रस्त्यात अडवून अपमानित केले.

AI Generated Image
उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. आपल्या चुलत भावासोबत बाजारात गेलेल्या सानिया नावाच्या तरुणीला तिच्याच होणाऱ्या पतीने रस्त्यात अडवून अपमानित केले. "भावासोबत बाजारच्या बहाण्याने रंग उधळतेस का?" असा संशय घेत त्याने सानियाला भररस्त्यात मारहाण केली. या सार्वजनिक अपमानाचा धक्का सहन न झाल्याने सानियाने घरी परतताच विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांतील लग्नाच्या आनंदाचे रूपांतर आता दुःखात झाले आहे.
नेमकं प्रकरण काय?
बिजनौरमधील झलरा गावातील सलीम आणि सानिया यांचा विवाह निश्चित झाला होता. ईद झाल्यानंतर काही दिवसातच या दोघांचा निकाह पार पडणार होता. रविवारी १५ मार्च रोजी सानिया आपल्या चुलत भावासोबत आणि बहिणीसोबत बाईकवरून लग्नाची खरेदी करण्यासाठी बिजनौरच्या बाजारात जात होती. मागच्या रविवारी घेतलेले काही कपडे न आवडल्याने ते बदलण्यासाठी ती जात होती.
रस्त्यातच मंगेतरने अडवलं आणि...
सानिया बाजाराकडे जात असताना वाटेत तिचा होणारा नवरा सलीम आपल्या मित्रासह तिथे पोहोचला. सानियाला परपुरुषासोबत बाईकवर पाहून सलीमचा पारा चढला. त्याने तिची बाईक थांबवून "कुठे चाललीस?" अशी विचारणा करत जाब विचारण्यास सुरुवात केली. सानियाने सत्य परिस्थिती सांगितली, तरीही सलीमने तिच्या चारित्र्यावर संशय घेत "बाजारच्या बहाण्याने गुलछर्रे उडवतेस," असा आरोप केला. वाद इतका वाढला की, सलीमने सानियाला सर्वांसमोर दोन-तीन कानशिलात लगावून अपमानित केले.
अपमान सहन झाला नाही आणि टोकाचं पाऊल उचललं
भररस्त्यात आपल्या होणाऱ्या पतीने केलेल्या या दुर्व्यवहारामुळे सानिया पूर्णपणे खचली. रडत रडत ती घरी पोहोचली आणि कोणालाही काही न सांगता तिने विषारी पदार्थ खाल्ला. तिची प्रकृती बिघडल्याचे पाहून शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले, पण उपचार सुरू होण्यापूर्वीच तिने अखेरचा श्वास घेतला.
वडील आणि होणाऱ्या पतीवर आरोप
या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण आहे. काही गावकऱ्यांनी सानियाच्या वडिलांवरही आरोप केला आहे की, मुलगी खोलीत अर्धा तास तडफडत असतानाही तिला वेळेवर रुग्णालयात नेले नाही. बिजनौरचे एसपी सिटी डॉ. कृष्ण गोपाल सिंह यांनी सांगितले की, मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून, अद्याप कुटुंबीयांनी कोणतीही तक्रार दिलेली नाही. मात्र, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.
ज्या घरात लग्नाचे कपडे आणि दागिने खरेदीची गडबड सुरू होती, तिथे आता सानियाच्या मृत्यूने स्मशानशांतता पसरली आहे. संशयाने एका हसत्याखेळत्या मुलीचा बळी घेतल्याने संपूर्ण बिजनौर जिल्हा हळहळत आहे.