लव्ह ट्रँगलचा रक्तरंजित शेवट! बॉयफ्रेंडसोबत मिळून अभिनेत्रीने केली पार्टनरची हत्या, १२ दिवसांनी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 11:16 IST2026-03-03T11:15:30+5:302026-03-03T11:16:28+5:30
'लव्ह ट्रँगल'मधून घडलेल्या या प्रकरणात अभिनेत्रीने आपल्या लिव्ह-इन पार्टनरशी लग्न करण्याऐवजी दुसऱ्या व्यक्तीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि पार्टनरचीच हत्या केली.

लव्ह ट्रँगलचा रक्तरंजित शेवट! बॉयफ्रेंडसोबत मिळून अभिनेत्रीने केली पार्टनरची हत्या, १२ दिवसांनी...
अभिनेत्री उर्मिला उर्फ बिंदू हिने बंगळुरूच्या मंजुनाथ नगर भागात एका धक्कादायक कृत्य केलं आहे. 'लव्ह ट्रँगल'मधून घडलेल्या या प्रकरणात अभिनेत्रीने आपल्या लिव्ह-इन पार्टनरशी लग्न करण्याऐवजी दुसऱ्या व्यक्तीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि पार्टनरचीच हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी उर्मिलासह तीन आरोपींना अटक केली आहे. मोहन राव असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव असून १८ फेब्रुवारी रोजी ही हत्या झाली होती.
उर्मिला उर्फ बिंदू हिने ‘बजरंगी’, ‘पोलीस क्वार्टर्स’ आणि ‘कालभैरव’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिंदू आणि तिचा प्रियकर विनय यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. तपास अधिकाऱ्यांच्या मते, या दोघांनी मिळून मोहन राव याच्या हत्येचा कट रचला, जो बिंदूसोबच लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. या कटानुसार बिंदू आणि मोहन ज्या घरात राहत होते, तिथेच एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं.
लिव्ह-इन पार्टनरची हत्या
'द हिंदू'च्या रिपोर्टनुसार, मोहन राव हा व्यवसाय करत होता. पत्नीपासून वेगळं झाल्यानंतर तो बिंदूसोबत लिव्ह-इनमध्ये राहत होता. बिंदू देखील आपल्या पतीसोबत राहत नव्हती. दोन महिन्यांपूर्वी बिंदू आणि मोहन यांनी मंजुनाथ नगरमध्ये एक घर भाड्याने घेतलं होतं. पार्टीत दारू प्यायल्यानंतर घरातच मोहनवर हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली.
विनयने त्याचा मित्र धनुष च्या मदतीने मोहन यांच्यावर चाकूने वार केले. जेव्हा मोहन ओरडू लागले, तेव्हा बिंदूने त्यांच्या तोंडाला आणि नाकाला टेप लावली आणि हात-पाय बांधून ठेवले. गुदमरल्यामुळे आणि जखमांमुळे मोहनचा मृत्यू झाला. यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
१२ दिवसांनंतर हत्येचा उलगडा
१२ दिवसांनंतर शेजाऱ्यांना घरातून दुर्गंधी येऊ लागली, त्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. तेव्हा या हत्येचा उलगडा झाला. शेजाऱ्यांनी सांगितलं की, घर अनेक दिवस बंदच होतं. २८ फेब्रुवारी रोजी दुर्गंधी आल्यावर घरमालक नटराज यांनी पोलिसांना कळवलं. तपासादरम्यान पोलिसांना मोहनचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. सध्या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पोलीस त्यांची चौकशी करत आहेत.