बदल्याची आग! ४५ सेकंदात विद्यार्थ्याला ३१ वेळा बेल्टने मारलं; मुख्याध्यापकांकडे तक्रार केल्याची मोठी शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 13:29 IST2026-01-29T13:27:47+5:302026-01-29T13:29:47+5:30
शालेय विद्यार्थ्यांमधील वाढती हिंसा पाहायला मिळाली आहे. शिवीगाळ केल्याची तक्रार करणं एका विद्यार्थ्याला इतकं महागात पडलं की, त्याला भररस्त्यात बेल्ट, लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली.

बदल्याची आग! ४५ सेकंदात विद्यार्थ्याला ३१ वेळा बेल्टने मारलं; मुख्याध्यापकांकडे तक्रार केल्याची मोठी शिक्षा
मध्य प्रदेशातील सिंग्रोली जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांमधील वाढती हिंसा पाहायला मिळाली आहे. शिवीगाळ केल्याची तक्रार करणं एका विद्यार्थ्याला इतकं महागात पडलं की, त्याला भररस्त्यात बेल्ट, लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे, अवघ्या तीन दिवसांपूर्वी कॉन्व्हेंट चौकात दहावीच्या विद्यार्थ्याला झालेल्या सामूहिक मारहाणीचे प्रकरण अद्याप ताजं असतानाच ही दुसरी घटना समोर आली आहे.
पीडित विद्यार्थी ज्ञानेश विश्वकर्मा हा १२ वीत शिकतो. २६ जानेवारी रोजी काही वर्गमित्रांनी त्याला शिवीगाळ केली होती. या त्रासाला कंटाळून त्याने धाडस दाखवत शाळेच्या मुख्याध्यापकांकडे तक्रार केली. मुख्याध्यापकांनी त्या तिन्ही विद्यार्थ्यांना बोलावून चांगलंच झापलं. मात्र हीच तक्रार ज्ञानेशसाठी गुन्हा ठरली. मुख्याध्यापकांच्या ओरड्यामुळे संतापलेल्या आरोपी विद्यार्थ्यांनी बदला घेण्याचं ठरवलं. मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ज्ञानेश एकटा असल्याचं पाहून त्यांनी त्याला रस्त्यात अडवलं.
ज्ञानेश विश्वकर्माला रस्त्याच्या कडेला ओढत नेऊन जमिनीवर पाडण्यात आलं, त्यानंतर त्याच्यावर बेल्टने प्रहार करण्यात आले आणि लाथाबुक्क्यांचा वर्षाव झाला. माणुसकीला काळीमा फासणारं हे दृश्य कोणीतरी मोबाईलमध्ये कैद करून सोशल मीडियावर व्हायरल केलं. व्हिडीओ समोर येताच शालेय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शाळेत जाणारी मुलं इतकी हिंसक कशी होत आहेत? शिक्षणाची मंदिरं आता गुंडगिरीचे अड्डे बनत आहेत का? असे गंभीर प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.
निवास चौकी पोलिसांनी पीडित विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून तीन विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चौकी प्रभारी प्रियंका सिंह यांनी सांगितलं की, आरोपींचा शोध सुरू असून तपास सुरू आहे. कॉन्व्हेंट चौकातील घटनेनंतरही कोणतीही ठोस कारवाई किंवा देखरेख व्यवस्था दिसून आली नाही. परिणामी, एकापाठोपाठ एक व्हिडीओ समोर येत असून जिल्ह्याच्या प्रतिमेला तडे जात आहेत. जर आताच कडक पावले उचलली नाहीत, तर ही हिंसा भविष्यात एखाद्या विद्यार्थ्याचा जीवही घेऊ शकते असं म्हटलं जात आहे.