"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 20:51 IST2025-06-16T20:50:16+5:302025-06-16T20:51:09+5:30
१० दिवसांपूर्वी प्रयागराज जंक्शनवरून एक तरुण आपल्या पत्नीसोबत गोव्याला जात असताना अचानक बेपत्ता झाला.

"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
मध्य प्रदेशातील इंदूरच्या राजा रघुवंशीचे मेघालयात झालेले हत्याकांड अजूनही लोक विसरलेले नाहीत. हनीमूनसाठी गेलेल्या राजा रघुवंशीची पत्नी सोनम आणि तिच्या प्रियकराने सुपारी देऊन त्याची हत्या केली होती. अशीच एक धक्कादायक घटना आता उत्तर प्रदेशातीलप्रयागराज येथून समोर आली आहे. मात्र, येथे नशिबाने पती बचावला आणि परत घरी आला.
१० दिवसांपूर्वी प्रयागराज जंक्शनवरून एक तरुण आपल्या पत्नीसोबत गोव्याला जात असताना अचानक बेपत्ता झाला. त्यानंतर, बेपत्ता तरुणाची पत्नी तिच्या माहेरी पोहोचली आणि नंतर पोलीस ठाण्यात जाऊन तिने पती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. मात्र, तब्बल दहा दिवसांनी तो तरुण घरी परतला आणि त्यानंतर संपूर्ण कहाणीचे सत्य समोर आले.
गोव्यात काम करणारा तरुण अचानक झाला बेपत्ता
अचानक बेपत्ता झालेला आणि नंतर १० दिवसांनी परतलेला हा तरुण सरयामरेज पोलीस स्टेशन परिसरातील एका गावाचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. या तरुणाचे लग्न तीन वर्षांपूर्वी सुरियावन पोलीस स्टेशन परिसरातील एका गावातील मुलीशी झाले होते. हा तरुण गोव्यात आपल्या वडिलांसोबत एका कंपनीत काम करतो. विशेष म्हणजे, सहा महिन्यांपूर्वी या तरुणाची पत्नीही त्याच्यासोबत राहण्यासाठी गोव्यात गेली होती.
पत्नीच्या ओळखीच्या लोकांनी जंक्शनवर केले अपहरण
३ जून रोजी तो तरुण आपल्या पत्नीला सुरियानवा येथील तिच्या माहेरी घेऊन गेला. त्यानंतर ४ जून रोजी दोघेही गोव्याला जाण्यासाठी प्रयागराज जंक्शनवर पोहोचले. प्रयागराज जंक्शनवर ट्रेनमध्ये चढण्यापूर्वीच तो तरुण अचानक बेपत्ता झाला. तरुण बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी सरयामरेज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तरुण १० दिवसांनी घरी परतला, तेव्हा त्याने सांगितले की, त्याच्या पत्नीला ओळखणारे दोन तरुण जंक्शनवर आले होते. पत्नीसमोरच त्या ओळखीच्या लोकांनी त्याला मारहाण केली आणि कोलकात्याला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसवून कोलकात्याला नेले. त्यांनी त्याच्या पत्नीला काहीही केले नाही, असे त्याने सांगितले. कोलकात्यामध्ये त्यांनी त्याचे अपहरण केले आणि त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तो कसा तरी त्यांच्या तावडीतून सुटण्यात यशस्वी झाला आणि १३ जून रोजी घरी पोहोचला.
पोलिसांची भूमिका आणि पुढील तपास
तरुणाच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्यांनी सरायमरेज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सरायमरेज पोलीस ठाण्याने मात्र तरुणाच्या कुटुंबीयांना सुरियावन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. पत्नीच्या ओळखीच्या लोकांनी हे कृत्य का केले, यामागे नेमके काय कारण होते, याचा शोध पोलीस घेत आहेत.