राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 16:30 IST2025-06-09T16:30:33+5:302025-06-09T16:30:59+5:30
दोघेही मध्य प्रदेशातील इंदूर येथून हनिमूननिमित्त ईशान्य भारतात गेले होते...

राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
राजा रघुवंशी हत्येप्रकरणी, पोलिसांनी सोनम रघुवंशी हिला अटक केली आहे. ती साधारणपणे २ आठवड्यांपासून बेपत्ता होती. राजाच्या हत्येत तिचाही सहभाग असल्याचा आरोप आहे. दरम्यान, सोनम स्वतःला निर्दोष म्हणत असल्याचे वृत्त आहे. एवढेच नाही, तर ती अपहरणाचा दावाही करत आहे. तथापि, पोलिसांचा तपास अद्यापही सुरूच आहे. सोनम व्यतिरिक्त आणखी चार जणांना अटक करण्यात आली आहे. राजाचा मृतदेह २ जून रोजी एका दरीत आढळला होता. तर, सोनम बेपत्ता होती. दोघेही मध्य प्रदेशातील इंदूर येथून हनिमूननिमित्त ईशान्य भारतात गेले होते.
न्यूज१८ ने पोलीस सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, आपण आरोपी नसून, या प्रकरणातील पीडित आहोत. अपहरण केल्यानंतर आपल्याला उत्तर प्रदेशच्या गाझीपूर येथे सोडण्यात आले होते. यानंतर आपण तेथून आपल्या भावाला फोन केला, असा दावा सोनमने केला आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, या फोन कॉलसंदर्भात, कुटुंबीयांनी पोलिसांना सूचना दिली. यानंतर, पोलिसांनी सोनमला अटक केली.
मेघालयाच्या पोलीस महासंचालक (डीजीपी) आय नोंगरांग यांनी सोमवारी पीटीआय-भाषाला दिलेल्या माहितीनुसार, राजाची पत्नी सोनम हिने उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. तर रात्रभरात केलेल्या छापेमारीत इतर तिघांना अटक करण्यात आली.
नोंगरांग यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या तीन जणांपैकी दोघे मध्य प्रदेशातील इंदूर आणि एक उत्तर प्रदेशातील ललितपूर येथील आहे. 'एक आरोपी उत्तर प्रदेशातून पकडला गेला आणि इतर दोन आरोपींना विशेष तपास पथकाने (एसआयटी) इंदूर येथून पकडले. 'सोनमने उत्तर प्रदेशातील नंदगंज पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले आणि नंतर तिला अटक करण्यात आली.'