माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 19:43 IST2025-06-20T19:42:44+5:302025-06-20T19:43:22+5:30
एका आईने तिच्या बॉयफ्रेंडसाठी आपल्या दोन लहान मुलांना विष देऊन मारलं. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी भोपा पोलीस स्टेशन परिसरातील रुडकाली गावात एका आईने तिच्या बॉयफ्रेंडसाठी आपल्या दोन लहान मुलांना विष देऊन मारलं. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
मुलांमध्ये ५ वर्षांचा अरहान आणि १ वर्षाची इनाया यांचा समावेश आहे. दोन्ही मुलं त्यांची आई मुस्कानसोबत खोलीत झोपली होती. मुस्कानने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा पती वसीमने चंदीगडहून फोन करून मुलांच्या तब्येतीची विचारपूस केली तेव्हा तिने मुलांना उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते जागे झाले नाहीत. रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केलं.
मुलांच्या शरीरावर कोणत्याही जखमांच्या खुणा नव्हत्या आणि घरात बाहेरून कोणी आल्याचा कोणताही पुरावा नव्हता. पोलिसांना संशय आला. त्यानंतर मुस्कानची कसून चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान मुस्कानने तिचा गुन्हा कबूल केला. चौकशीदरम्यान मुस्कानने पोलिसांना सांगितलं की, तिचे शेजारच्या खेडी फिरोजाबाद गावातील रहिवासी जुनैदसोबत प्रेमसंबंध होते.
मुस्कानला जुनैदसोबत पळून जायचं होतं पण मुलं अडथळा ठरत होती. म्हणूनच तिने नाश्त्यात विष मिसळून आपल्याच मुलांची हत्या केली. पोलिसांनी मुस्कानला अटक केली आहे आणि आता तिचा बॉयफ्रेंड जुनैदचा शोध सुरू आहे. लवकरच त्याला अटक केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.