मॉर्निंग वॉकला गेलेल्या वकिलावर झाडल्या गोळ्या; हत्या केली पण बाइक सुरू होईना! भररस्त्यात फिल्मी ड्रामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 13:46 IST2026-04-11T13:44:00+5:302026-04-11T13:46:37+5:30
मिर्झापूरमध्ये एका वकिलाची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

मॉर्निंग वॉकला गेलेल्या वकिलावर झाडल्या गोळ्या; हत्या केली पण बाइक सुरू होईना! भररस्त्यात फिल्मी ड्रामा
Mirzapur Crime: उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये गुन्हेगारांचे धाडस इतके वाढले आहे की, एका ज्येष्ठ वकिलाची भररस्त्यात आणि दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शनिवारी सकाळी ७:१५ वाजता घडलेल्या या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हत्येनंतर मारेकऱ्यांची दुचाकी सुरू न झाल्याने काही वेळ घटनास्थळी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.
मिर्झापूरच्या कटरा परिसरात ही घटना घडली. ज्येष्ठ वकील आणि तीन वेळा सरपंच राहिलेले राजीव सिंह ऊर्फ रिंकू (४५) हे दररोजप्रमाणे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. घरापासून अवघ्या २०० मीटर अंतरावर दोन दुचाकीस्वार हल्लेखोरांनी त्यांना अडवले. पाठीमागे बसलेल्या हल्लेखोराने खाली उतरून राजीव सिंह यांच्या छातीला पिस्तूल लावून थेट गोळी झाडली. रक्ताच्या थारोळ्यात राजीव सिंह जमिनीवर कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
हत्या केली पण बाइक सुरू होईना! भररस्त्यात फिल्मी ड्रामा
सीसीटीव्ही फुटेजमध्ये धक्कादायक दृश्ये समोर आली आहेत. गोळी झाडल्यानंतर आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात होते, पण त्यांची बाइक सुरू झाली नाही. बाइक चालवणाऱ्या आरोपीने १५-१६ वेळा किक मारली, तरीही गाडी सुरू होत नव्हती. शेवटी गोळी झाडणाऱ्या मुख्य आरोपीने स्वतः किक मारली. यादरम्यान परिसरातील लोक त्यांना पकडण्यासाठी धावले, मात्र आरोपींनी हवेत पिस्तूल उगारून लोकांना धमकावले. दहशतीमुळे लोक मागे सरकले आणि अखेर बाइक सुरू करून आरोपी पसार झाले.
काय आहे हत्येमागचे कारण?
पोलीस अधीक्षक अपर्णा रजत कौशिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही हत्या राजकीय आणि जुन्या वैमनस्यातून झाली आहे. मृत राजीव सिंह यांची पत्नी प्रतिभा सिंह सध्या गावच्या सरपंच आहेत. मुख्य आरोपी राजेंद्र सोनकर यानेही त्यांच्याविरोधात सरंपचपदाची निवडणूक लढवली होती, ज्यात त्याचा पराभव झाला होता. आरोपी राजेंद्र हा वकिलाच्या घराशेजारीच भाड्याने राहत होता आणि त्याने त्यांच्या हालचालींवर रेकी केली होती. ७ महिन्यांपूर्वीही त्याने राजीव सिंह यांना धमकावून त्यांच्यावर पिस्तूल ताणले होते. त्यावेळी तक्रार करूनही पोलिसांनी कारवाई केली नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
राजीव सिंह हे विंध्याचल पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या देवरी गावचे रहिवासी होते. मात्र, मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी २०११ मध्ये मिर्झापूर शहरात घर बांधले होते. त्यांना ओम (१८) आणि सार्थक (१२) अशी दोन मुले आहेत. त्यांची पत्नी प्रतिभा सिंह या गावातच राहून सरपंचपदाचे काम पाहतात. या खळबळजनक हत्येनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी राजेंद्र सोनकर याची ओळख पटवली असून, त्याच्या अटकेसाठी पथके रवाना केली आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे दुसऱ्या आरोपीचाही शोध घेतला जात आहे.