बॉयफ्रेंन्डची हत्या करणारी प्रिया करतेय लग्न; नवरदेवाने प्रेयसीच्या सांगण्यावरुन केलीय ५ जणांची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 19:44 IST2026-01-23T19:33:36+5:302026-01-23T19:44:41+5:30
जन्मठेप झालेले दोन कैदी पॅरोलवर बाहेर येऊन लग्न करणार आहेत.

बॉयफ्रेंन्डची हत्या करणारी प्रिया करतेय लग्न; नवरदेवाने प्रेयसीच्या सांगण्यावरुन केलीय ५ जणांची हत्या
Priya Seth Weds Hanuman Prasad: राजस्थानमधील जेलमधील एक अजब प्रेमकाहाणी समोर आली आहे. राज्याच्या इतिहासातील दोन अत्यंत खळबळजनक हत्याकांडात जन्मठेपेची शिक्षा भोगणारे दोन गुन्हेगार आता विवाहबंधनात अडकणार आहेत. जयपूरच्या ओपन जेलमध्ये एकमेकांच्या प्रेमात पडलेले हे दोन गुन्हेगार चक्क पॅरोलवर बाहेर येऊन लग्न करत आहेत. या लग्नामुळे पोलीस प्रशासनापासून सामान्य जनतेपर्यंत सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
वधू प्रिया सेठ ही राजस्थानमधील कुख्यात हनीट्रॅप टोळीची सूत्रधार आहे. २०१८ मध्ये तिने टिंडर ॲपच्या माध्यमातून दुष्यंत शर्मा नावाच्या तरुणाला आपल्या जाळ्यात ओढले होते. आपल्या प्रियकराचे कर्ज फेडण्यासाठी तिने दुष्यंतला ओलीस धरून त्याच्या वडिलांकडून १० लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणी मिळाल्यावरही ओळख उघड होईल या भीतीने तिने दुष्यंतची निर्घृण हत्या केली आणि मृतदेह सुटकेसमध्ये भरून आमेरच्या डोंगरात फेकून दिला होता. या गुन्ह्यासाठी तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
कोण आहे 'नराधम' वर?
दूल्हा हनुमान प्रसाद उर्फ जॅक याने २०१७ मध्ये संपूर्ण देशाला हादरवणारे हत्याकांड केले होते. त्याने आपली प्रियकरा संतोष शर्मा हिच्या सांगण्यावरून तिच्या पतीची आणि चार निष्पाप मुलांची गळा चिरून हत्या केली होती. प्राणी कापण्याच्या सुऱ्याने त्याने पाच जणांना यमसदनी धाडले होते. या गंभीर गुन्ह्यासाठी हनुमान देखील जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.
जेलमध्ये फुललं प्रेम, पॅरोलवर लग्न
हे दोघेही जयपूरच्या सांगानेर येथील ओपन जेलमध्ये शिक्षा भोगत होते. सहा महिन्यांपूर्वी त्यांची तिथे भेट झाली. गप्पांमधून मैत्री झाली आणि त्याचे रूपांतर प्रेमात झाले. राजस्थान उच्च न्यायालयाने दोघांना लग्नासाठी १५ दिवसांचा आपत्कालीन पॅरोल मंजूर केला आहे.
अखेरच्या क्षणी लग्नाचं ठिकाण बदललं
आधी हे लग्न अलवर जिल्ह्यातील बडोदामेव येथे होणार होते, ज्याची लग्नपत्रिकाही व्हायरल झाली होती. मात्र, वाढता विरोध आणि सुरक्षेच्या कारणास्तव लग्नाचे ठिकाण अचानक बदलून जयपूरमधील सांगानेर परिसरात करण्यात आल्याची माहिती आहे. हनुमानचे कुटुंब गावातून गायब असून ते गुप्तपणे हा विवाह पार पाडत आहेत.
समाज आणि कायद्यासमोर प्रश्नचिन्ह
दोन क्रूर गुन्हेगारांचे हे लग्न आता वादाचा विषय ठरले आहे. ज्या हातांनी निष्पाप मुलांचे गळे चिरले आणि ज्यांनी पैशांसाठी मानुसकी विकली, त्यांना अशा प्रकारे सवलत मिळणे योग्य आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे.