नराधमपणाचा कळस! मुलाचा आजार बरा करण्यासाठी पोटच्या मुलीचा बळी; आईनेच आवळला गळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 10:12 IST2026-04-03T10:11:49+5:302026-04-03T10:12:09+5:30
मुलाचा आजार बरा करण्यासाठी झारखंडमध्ये एका आईने आपल्याच मुलीचा नरबळी दिला आहे. तांत्रिक महिलेसह ३ जणांना अटक करण्यात आली आहे.

नराधमपणाचा कळस! मुलाचा आजार बरा करण्यासाठी पोटच्या मुलीचा बळी; आईनेच आवळला गळा
अंधश्रद्धेचा आणि क्रूरतेचा एक अत्यंत भयानक प्रकार झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यातून समोर आला आहे. आपल्या लहान मुलाचा आजार बरा व्हावा, या हव्यासापोटी एका आईने आपल्याच किशोरवयीन मुलीचा नरबळी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका तांत्रिकाच्या सांगण्यावरून हे अघोरी कृत्य करण्यात आले असून, या प्रकरणी पोलिसांनी नराधम आई, तांत्रिक महिला आणि एका साथीदाराला अटक केली आहे.
मुलाच्या आजारासाठी मुलीचा बळी
कुसुंभा गावातील ३५ वर्षीय रेशमी देवी हिचा लहान मुलगा शारीरिक आणि मानसिक आजाराने त्रस्त होता. मुलाला बरे करण्यासाठी ती गावातील ५५ वर्षीय शांती देवी या तांत्रिक महिलेकडे वारंवार जात असे. या तांत्रिकाने रेशमीला सांगितले की, "मुलाचा आजार पूर्णपणे बरा करायचा असेल, तर एका कुमारिकेचा बळी द्यावा लागेल." दुर्दैवाने, या अंधश्रद्धेपोटी रेशमीने आपल्याच पोटच्या मुलीला मृत्यूच्या दाढेत ढकलण्याचा निर्णय घेतला.
मिरवणुकीच्या आडून क्रूर कृत्य
२४ मार्च रोजी संपूर्ण गाव रामनवमीच्या मंगला जुलूसमध्ये मग्न असताना, या नराधमांनी आपले काम फत्ते केले. तांत्रिक शांती देवीच्या घरात रेशमी देवी आणि तिचा साथीदार भीम राम यांनी मुलीचा गळा आवळून तिची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या नराधमांनी रीतसर पूजा करून मुलीच्या शरीराचा छळ केला आणि रक्ताचा टिळा लावण्यासाठी तिच्यावर वार केले. त्यानंतर तिचा मृतदेह एका बागेत पुरून टाकला.
तपासाची दिशा भरकटवण्याचा प्रयत्न
२५ मार्च रोजी मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर आरोपी आईने आपल्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार झाल्याचा बनाव रचला होता. मात्र, शवविच्छेदन अहवाल आणि फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये बलात्काराची पुष्टी झाली नाही. कडक चौकशीनंतर आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भीम राम याच्यावर यापूर्वीही आपल्या वहिनीच्या हत्येचा आरोप आहे.
उच्च न्यायालयाने घेतली दखल
या घटनेने झारखंडमध्ये संतापाची लाट उसळली आहे. झारखंड उच्च न्यायालयाने प्रसारमाध्यमांतील वृत्तांची दखल घेत या प्रकरणाची सुमोटो दखल घेतली आहे. न्यायालयाने राज्य सरकार आणि पोलीस प्रमुखांना नोटीस बजावली आहे. दुसरीकडे, या घटनेच्या निषेधार्थ भाजपने सोमवारी हजारीबागमध्ये १२ तासांचा बंद पुकारला होता. अंधश्रद्धेच्या नावाखाली सख्या आईनेच मुलीचा बळी घेतल्याने समाजमन सुन्न झाले असून, या नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत आहे.