इंजेक्शन, विष की २० कोटींची प्रॉपर्टी? साध्वी प्रेम बाईसा यांच्या मृत्यूचे गूढ कायम; पोलिसांचा तपास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 18:02 IST2026-02-02T18:00:21+5:302026-02-02T18:02:48+5:30
घटनेला पाच दिवस उलटून गेले तरी जोधपूर पोलिसांना मृत्यूचे नेमके कारण शोधण्यात यश आलेले नाही.

इंजेक्शन, विष की २० कोटींची प्रॉपर्टी? साध्वी प्रेम बाईसा यांच्या मृत्यूचे गूढ कायम; पोलिसांचा तपास सुरू
राजस्थानमधील प्रसिद्ध कथावाचक साध्वी प्रेम बाईसा यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. घटनेला पाच दिवस उलटून गेले तरी जोधपूर पोलिसांना मृत्यूचे नेमके कारण शोधण्यात यश आलेले नाही. २० कोटी रुपयांहून अधिक असलेली मालमत्ता, वडिलांचे संशयास्पद जबाब आणि इंजेक्शनचा अँगल, यामुळे हे प्रकरण आता अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे.
मृत्यूचे रहस्य: इंजेक्शन की अन्नाचा घास?
साध्वी प्रेम बाईसा यांच्या मृत्यूबाबत दोन परस्परविरोधी दावे समोर येत आहेत. साध्वींचे वडील विरमनाथ यांनी पोलिसांना सांगितले की, "त्यांना इंजेक्शन देण्यात आले होते, त्यानंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला." मात्र, त्यांच्या ड्रायव्हरने दिलेल्या जबाबानुसार, "जेवताना अन्नाचा घास घशात अडकल्यामुळे साध्वींना बोलता येत नव्हते." या दोन वेगवेगळ्या दाव्यांमुळे पोलिसांचा संशय बळावला असून, 'एसआयटी'ने साध्वींच्या आश्रमातील काही भाग सील केला आहे.
२० कोटींची मालमत्ता आणि बँक खाती तपासाच्या फेऱ्यात
तपासादरम्यान पोलिसांचे लक्ष आता साध्वींच्या अफाट संपत्तीकडे वळले आहे. प्राथमिक माहितीनुसार, साध्वी प्रेम बाईसा यांची २० कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता आहे. ही संपत्ती हडपण्यासाठी तर हा कट रचला गेला नाही ना? या दृष्टीने पोलीस त्यांच्या बँक खात्यांची आणि सोशल मीडिया अकाउंट्स सांभाळणाऱ्या सेवादारांची चौकशी करत आहेत.
वडील आणि मामांची कसून चौकशी
पोलिसांनी अद्याप कोणालाही 'क्लीन चिट' दिलेली नाही. साध्वींचे वडील विरमनाथ यांची काल सलग तीन तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना पुन्हा एसपी कार्यालयात बोलावण्यात आले होते. वडिलांसोबतच साध्वींचे मामा सुरेश यांचीही रात्री उशिरापर्यंत चौकशी करण्यात आली आहे.
'व्हिसेरा' रिपोर्टवर सर्व अवलंबून
साध्वींच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले असले तरी, त्यात मृत्यूचे स्पष्ट कारण समोर येऊ शकले नाही. त्यामुळे आता पोलिसांना फॉरेन्सिक आणि व्हिसेरा रिपोर्टची प्रतीक्षा आहे. शरीरात विषाचा अंश होता की औषधाचा ओव्हरडोज, हे या रिपोर्टनंतरच स्पष्ट होईल. तोपर्यंत जोधपूरमध्ये या मृत्यूवरून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.