'मला गाव नको, शहरच हवं!' पत्नीच्या हट्टाला पती कंटाळला, केलं क्रूर कृत्य, ऐकून होईल थरकाप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 14:50 IST2026-01-21T14:48:59+5:302026-01-21T14:50:11+5:30
'मला गावात राहायचं नाही, तर शहरातच राहायचं आहे', या हट्टाला कंटाळून एका पतीने आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

'मला गाव नको, शहरच हवं!' पत्नीच्या हट्टाला पती कंटाळला, केलं क्रूर कृत्य, ऐकून होईल थरकाप
पती-पत्नीमधील किरकोळ वाद कधी विकोपाला जातील आणि त्यातून एखादं क्रूर हत्याकांड घडेल, याचा नेम राहीलेला नाही. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळच्या छोला परिसरातून अशीच एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. 'मला गावात राहायचं नाही, तर शहरातच राहायचं आहे', या हट्टाला कंटाळून एका पतीने आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
१४ महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न
३० वर्षीय कांचन साहू हिचा विवाह १४ महिन्यांपूर्वी रायसेन जिल्ह्यातील हेमराज साहू याच्याशी झाला होता. विशेष म्हणजे कांचन आणि हेमराज या दोघांचेही हे दुसरे लग्न होते आणि दोघांचाही पूर्वी घटस्फोट झाला होता. हेमराज हा भाजीचा गाडा चालवून आपला उदरनिर्वाह करायचा. रायसेनमधील आपल्या मूळ गावी आई-वडिलांसोबत कांचनने राहावे अशी हेमराजची इच्छा होती, मात्र कांचनला शहरात राहण्याची ओढ होती.
'तो' वाद आणि खूनी खेळ
गेल्या अनेक महिन्यांपासून या दोघांमध्ये गाव आणि शहर यावरून खटके उडत होते. मकर संक्रांतीला कांचन माहेरी गेली असताना तिने आईला सांगितले होते की, पती सतत गावात राहण्यासाठी दबाव टाकत आहे. रविवारी रात्री याच मुद्द्यावरून दोघांमध्ये पुन्हा जोरदार भांडण झाले. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि रागाच्या भरात हेमराजने कांचनच्या तोंडात कापडाचा बोळा कोंडून तिचा गळा आवळला. यातच कांचनचा जागीच मृत्यू झाला.
हत्या करून दुसऱ्या खोलीत जाऊन झोपला!
हेमराजचे क्रौर्य इतक्यावरच थांबले नाही. पत्नीचा गळा आवळल्यानंतर तिला शुद्ध येईल असे वाटून तो दुसऱ्या खोलीत जाऊन आरामात झोपला. सकाळी जेव्हा तिला जाग आली नाही, तेव्हा त्याने स्वतःच सासरच्या मंडळींना फोन करून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच छोला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि हेमराजला बेड्या ठोकल्या.
पोलिसांकडे दिली गुन्ह्याची कबुली
एसीपी अक्षय चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमराजने आपला गुन्हा कबूल केला आहे. पत्नीने गावात येण्यास नकार दिल्याने आपण हे पाऊल उचलल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. सध्या पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.