बाेलण्यात गुंतवून वृद्धांची फसवणूक करणाऱ्या चाैघांना अटक; १६ लाख ९९ हजारांचे दागिने हस्तगत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 22:52 IST2026-02-09T22:51:30+5:302026-02-09T22:52:23+5:30
ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कामगिरी...

बाेलण्यात गुंतवून वृद्धांची फसवणूक करणाऱ्या चाैघांना अटक; १६ लाख ९९ हजारांचे दागिने हस्तगत
ठाणे : ज्येष्ठ नागरिकांना बाेलण्यात गुंतवून, भुरळ घालून, हातचलाखीने त्यांच्या अंगावरील साेन्याचे दागिने फसवणुकीने लुबाडणाऱ्या राजू चव्हाण (वय ४८, रा. वडाळा, मुंबई), रमेश विजयकुमार जैस्वाल (४९, चेंबूर, मुंबई), संजय दत्ताराम मांगडे (५३, चेंबूर, मुंबई) या तीन भामट्यांसह त्यांना मदत करणाऱ्या रामसिंग चौहान (४५, वडाळा, मुंबई) अशा चाैघांना अटक केल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पाेलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी साेमवारी दिली. त्यांच्या ताब्यातून १६ लाख ९९ हजारांचे साेन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.
गेल्या तीन महिन्यांत ठाणे, बदलापूर, कल्याण, उल्हासनगर शहर परिसरात सर्वसामान्य नागरिकांसह ज्येष्ठ नागरिकांना बाेलण्यात गुंतवून, त्यांना भुरळ पाडून हातचलाखीने त्यांचे दागिने लुबाडण्याच्या घटना घडल्या हाेत्या. त्याच अनुषंगाने असे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश पाेलिस आयुक्त आशुताेष डुंबरे यांनी गुन्हे शाखेला दिले हाेते. ही टोळी रस्त्याने जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना गाठून त्यांची फसवणूक करण्यात तरबेज असल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांना या टोळीने लुबाडले होते. याच पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या उल्हासनगर युनिटने अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विशेष माेहीम राबविली. रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा अभ्यास करून त्यांचा शोध सुरू केला होता.
ठकसेन टाेळीची माहिती उल्हासनगर युनिटला काही खबऱ्यांकडून मिळाली. पाेलिस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहायक आयुक्त शेखर बागडे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक याेगेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनात सहायक पाेलिस निरीक्षक विजय काजारी, हवालदार राजेंद्र थाेरवे आणि अशाेक थाेरवे आदींच्या पथकाने सापळा लावून राजू चव्हाण याच्यासह तिघांना २२ जानेवारी २०२६ राेजी अटक केली. या टोळीला दागिने विक्री करण्यास आणि त्यांची विल्हेवाट लावण्यात मदत करणाऱ्या रामसिंग चौहान या सराफा व्यावसायिकाला अटक केली. या टोळीने ठाणे, मुंब्रा, उल्हासनगर आणि बदलापूर आदी परिसरात फसवणुकीचे १२ गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून फसवणुकीतील १६ लाख ९९ हजारांचे १३० ग्रॅम वजनाचे साेन्याचे दागिने हस्तगत केले.
अशी करायचे लूट -
ठाणे, मुंबईतील सार्वजनिक रस्त्यावरुन जाणाऱ्या-येणाऱ्या लाेकांना ओळख दाखविण्याचा प्रयत्न करून त्यांना हे टाेळके बाेलण्यात गुंतवित असे. त्यानंतर हातचलाखीने त्यांच्या अंगावरील साेन्याचे दागिने आणि राेकड काढून घेत असत.