ED Action on Xiaomi India: घोटाळेबाज! शाओमीवर ईडीची तगडी कारवाई! साडे पाच हजार कोटी जप्त केले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2022 16:46 IST2022-04-30T16:46:11+5:302022-04-30T16:46:24+5:30
शाओमी इंडिया ही चीनच्या शाओमीच्या संपूर्ण मालकीची कंपनी आहे. कंपनीने बेकायदेशीरपणे पैसे पाठवल्याप्रकरणी ईडीने या वर्षी फेब्रुवारीमध्ये चौकशी सुरू केली होती. जप्त केलेली रक्कम कंपनीच्या बँक खात्यात पडून होती.

ED Action on Xiaomi India: घोटाळेबाज! शाओमीवर ईडीची तगडी कारवाई! साडे पाच हजार कोटी जप्त केले
अलिकडे राजकारण्यांवरील कारवाईवरून चर्चेत आलेल्या ईडीने जगातील सर्वात मोठ्या स्मार्टफोन ब्रँडपैकी एक असलेल्या शाओमीवर मोठी कारवाई केली आहे. शाओमी टेक्नोलॉजी इंडिया प्राइवेट लिमिटेड (Xiaomi India) चे 5551.27 कोटी रुपये जप्त केले आहेत.
विदेशी मुद्रा व्यवस्थापन कायदा, 1999 च्या नियमांनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. शाओमी इंडिया ही चीनच्या शाओमीच्या संपूर्ण मालकीची कंपनी आहे. कंपनीने बेकायदेशीरपणे पैसे पाठवल्याप्रकरणी ईडीने या वर्षी फेब्रुवारीमध्ये चौकशी सुरू केली होती. जप्त केलेली रक्कम कंपनीच्या बँक खात्यात पडून होती.
2014 मध्ये भारतात या कंपनीने आपला कारभार सुरु केला. तसेच २०१५ पासून चीनमध्ये पैसे पाठविण्यास सुरुवात केली. कंपनीने तीन विदेशी संस्थांना रॉयल्टीच्या नावाखाली 5551.27 कोटी रुपयांचे परकीय चलन पाठवले आहे. यात Xiaomi समुहाची एक संस्था देखील आहे. रॉयल्टीच्या नावाखाली एवढी मोठी रक्कम शाओमी ग्रुपच्या संस्थेच्या सूचनेनुसार पाठवण्यात आली. दुसऱ्या दोन कंपन्या अमेरिकेच्या जरी असल्या तरी त्याचा थेट लाभार्थी ही शाओमीच असल्याचे तपासात समोर आले आहे.
Xiaomi India MI च्या ब्रँड नावाने भारतात मोबाईल फोनचा व्यापारी आणि वितरक आहे. शाओमी भारतातील निर्मात्यांकडून पूर्णपणे तयार केलेले मोबाइल सेट आणि इतर उत्पादने खरेदी करते. परंतू ज्या तीन संस्थांना शाओमीने पैसे पाठविले त्यांच्याकडून काहीच खरेदी किंवा सेवा घेतली जात नाही. FEMA च्या कलम 4 चे उल्लंघन करत बोगस कागदपत्रे दाखवून शाओमीने हा घोटाळा केला आहे.