बायकोला पाठवण्यास सासरच्यांचा नकार; नवऱ्याची आत्महत्या, अडीच महिन्यांची लेक झाली पोरकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 17:21 IST2026-03-25T17:20:15+5:302026-03-25T17:21:25+5:30
अरविंदचं लग्न १४ महिन्यांपूर्वी बिजनौर शहरातील घेर रामबाग येथील रहिवासी ओमप्रकाश यांची मुलगी प्रीती हिच्याशी झालं होतं.

फोटो - आजतक
बिजनौरच्या इनामपुरा गावात राहणाऱ्या अरविंदने मंगळवारी विष पिऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. अरविंदचं लग्न १४ महिन्यांपूर्वी बिजनौर शहरातील घेर रामबाग येथील रहिवासी ओमप्रकाश यांची मुलगी प्रीती हिच्याशी झालं होतं. लग्नानंतर काही काळापासून पती-पत्नीमध्ये सतत वाद होत होते.
जानेवारी महिन्यात झालेल्या वादानंतर प्रीती आपल्या माहेरी निघून गेली होती. त्यानंतर अरविंद आणि प्रीती यांच्या कुटुंबियांमध्ये अनेकदा चर्चा झाली, मात्र कोणत्याही चर्चेतून ठोस तोडगा निघू शकला नाही. मंगळवारी अरविंदला चर्चेसाठी बोलावण्यात आलं होतं. अरविंद आपल्या पत्नीला आणण्यासाठी सासरी गेला होता, परंतु दोन्ही कुटुंबात पुन्हा वाद झाला.
सासरच्या मंडळींनी आपल्या मुलीला अरविंदसोबत पाठवण्यास स्पष्ट नकार दिला. या गोष्टीमुळे मनस्ताप होऊन अरविंदने विष घेतलं. संध्याकाळी जेव्हा तो घरी पोहोचला, तेव्हा त्याला उलट्या होऊ लागल्या. प्रकृती गंभीर झाल्याने कुटुंबियांनी त्याला बिजनौर शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं, जिथे उपचारादरम्यान अरविंदचा मृत्यू झाला.
अरविंद नातेवाईकांनी सासरच्या लोकांवर आरोप केला आहे की, त्यांनीच अरविंदला विष देऊन मारलं. मात्र, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद सुरू होता आणि पत्नीला सोबत न पाठवल्याने तो दुखावला. त्यानंतर त्याने विष प्राशन केलं. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
अरविंदला अडीच महिन्यांची एक मुलगी देखील आहे, जी सध्या तिच्या आईसोबत आहे. पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर कारण स्पष्ट होईल. पोलीस दोन्ही बाजूंच्या लोकांची चौकशी करत आहेत. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.