बर्फाचे पैसे मागितले म्हणून तो हैवान बनला! हत्या करून खोपडी चुलीत जाळली; क्रूरता ऐकून अंगावर येईल काटा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 16:06 IST2026-03-29T16:03:52+5:302026-03-29T16:06:21+5:30
केवळ बर्फाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली.

बर्फाचे पैसे मागितले म्हणून तो हैवान बनला! हत्या करून खोपडी चुलीत जाळली; क्रूरता ऐकून अंगावर येईल काटा
उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातून माणुसकीला लाजवेल अशी एक अत्यंत क्रूर आणि अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे. केवळ बर्फाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपीचे क्रौर्य एवढ्यावरच थांबले नाही, तर त्याने मृतदेहाचे मुंडके धडापासून वेगळे करून ते चुलीतील आगीत जाळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
नेमकं प्रकरण काय?
टिकैतनगर क्षेत्रातील परसवाल गावात राहणारा बबलू राजभर हा तरुण उन्हाळ्याच्या दिवसात बर्फ विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. शनिवारी आरोपी शंकर यादव याने बबलू कडून बर्फ विकत घेतला. मात्र, जेव्हा बबलूने त्याचे पैसे मागितले, तेव्हा दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापलेल्या शंकरने धारदार शस्त्राने बबलूवर सपासप वार केले.
नराधमाचा अमानवीय प्रताप
ग्रामस्थ आणि मृताच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या केल्यानंतर शंकर यादवने बबलूचे शिर धडावेगळे केले. त्यानंतर तो ते शिर जवळच असलेल्या एका झोपडीत घेऊन गेला आणि तिथल्या चुलीत टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळाचे दृश्य इतके भयानक होते की, ते पाहून प्रत्यक्षदर्शींचीही बोबडी वळली. बबलूचा चुलत भाऊ तिथेच उपस्थित होता, ज्याने हा सर्व थरार डोळ्यांनी पाहिला.
कुटुंबाचा आधार हरवला
बबलू हा त्याच्या चार भावांमध्ये सर्वात मोठा होता. आपल्या वृद्ध आई-वडिलांसह पत्नी आणि दोन लहान मुलांचा सांभाळ तो मेहनत करून करत असे. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने तो उन्हाळ्यात बर्फ विकत असे. मात्र, एका किरकोळ वादातून त्याच्या आयुष्याचा असा भयानक शेवट होईल, अशी कल्पना कोणालाच नव्हती. त्याच्या निधनानंतर आता कुटुंबासमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.
गावात संतापाची लाट
रविवारी शवविच्छेदनानंतर बबलूचा मृतदेह गावात पोहोचला तेव्हा संपूर्ण गाव शोकाकुल झाले होते. संतप्त ग्रामस्थांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. अशा नराधमाला समाजात जागा नसावी, अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.