मुजोर रिक्षाचालकाने बसच्या वाहकाला नेले फरपटत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 18:33 IST2019-12-09T18:33:03+5:302019-12-09T18:33:41+5:30
नाशिक-पुणे- सांगली बसचा अडविला होता रस्ता

मुजोर रिक्षाचालकाने बसच्या वाहकाला नेले फरपटत
पिंपरी : विरूद्ध दिशेने आलेल्या रिक्षाचालकाने बसचा रस्ता अडविला. त्यावरून बसचालक व त्याच्यात वाद झाला. वाद मिटविण्यासाठी आलेल्या बसच्या वाहकालाही शिवीगाळ करीत रिक्षाचालकाने त्याला फरपटत नेले. यात पायाला खरचटून वाहक जखमी झाला. मोशी येथे सोमवारी (दि. ९) सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. श्रीकांत मालीस गुरव (वय ३८, रा. कुपवाड, ता. मिरज, जि. सांगली) असे जखमी वाहकाचे नाव आहे. याप्रकरणी वाहक गुरव यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहक गुरव व चालक अशोक दिनकर काळकुटे (वय ३३, रा. जयसिंगपूर, जि. कोल्हापूर) हे दोघेही नाशिक - सांगली बस घेऊन जात होते. त्यावेळी मोशी येथे विरूद्ध दिशेने एक रिक्षा आली. पुरेसा रस्ता असतानाही रिक्षाचालकाने रिक्षा बससमोर थांबविली. त्यामुळे बसचालक काळकुटे रिक्षाचालकास म्हणाले, ह्यह्यरिक्षा निट चालव, रस्ता मोकळा आहे, तेथून जा.ह्णह्ण त्यानंतर अनोळखी रिक्षाचालकाने बसचालक काळकुटे यांना शिवीगाळ केली. त्यामुळे बसचे वाहक गुरव त्यांच्यातील वाद मिटविण्यासाठी बसच्या खाली उतरून रिक्षाजवळ गेले. रिक्षाचालकाला समजावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यावेळी त्याने वाहक गुरव यांनाही शिवीगाळ केली. तसेच वाहक गुरव रिक्षावर हात ठेवून उभे असताना त्याकडे दुर्लक्ष करून रिक्षाचालकाने त्याची रिक्षा सुरू करून घेऊन जात होता. त्यामुळे गुरव यांचा हात रिक्षात अडकून ते फरपटत गेले. हा प्रकार पाहून बसमधील प्रवासी तसेच काही नागरिकांनी आरडाओरडा केल्यानंतर रिक्षाचालक थांबला. फरपटत गेल्याने पायाला खरचटून वाहक गुरव जखमी झाले. गुरव यांच्या एशियाड बसमध्ये ५६ प्रवासी होते. त्यांचा खोळंबा होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना दुसºया बसने मार्गस्थ करण्यात आले. त्यानंतर बसचालक काळकुटे व वाहक गुरव यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. मुजोर चालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन बसचालक व वाहकासोबत रिक्षाचालकाने हुज्जत घातली. वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून विरूद्ध दिशेने रिक्षा चालवित असतानाही त्याची मुजोरी कायम होती. बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत असली तरी अशा काही मुजोर वाहनचालकांमुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येते. अशा वाहनचालकांवर कडक कारवाई करण्याची नागरिकांकडून मागणी होत आहे.