खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 11:40 IST2026-04-07T11:38:24+5:302026-04-07T11:40:11+5:30
एकाच कुटुंबातील दोन मुलींचा मृत्यू झाला असून आई-वडील गंभीर आजारी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डोसा खाल्ल्यानंतर ही घटना घडल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे.

खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
गुजरातच्या अहमदाबादमधील चांदखेडा परिसरात एकाच कुटुंबातील दोन मुलींचा मृत्यू झाला असून आई-वडील गंभीर आजारी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डोसा खाल्ल्यानंतर ही घटना घडल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे.
मुलींचे आजोबा गौरीशंकर प्रजापती यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ एप्रिलच्या रात्री त्यांचा मुलगा विमल याने घराशेजारील आयओसी रोडवर असलेल्या एका डेअरीतून डोसा बनवण्यासाठी पीठ विकत आणलं होतं. कुटुंबाने त्याच रात्री डोसा बनवून खाल्ला आणि दुसऱ्या दिवशीही उरलेल्या पिठाचे डोसे खाल्ले. त्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांना उलट्यांचा त्रास सुरू झाला, ज्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
दोन मुलींचा झाला मृत्यू
या कुटुंबात विमल, त्यांची पत्नी भावना आणि तीन महिने व चार वर्षांच्या दोन मुलींचा समावेश होता. उपचारादरम्यान ४ एप्रिल रोजी तीन महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला, तर ५ एप्रिल रोजी चार वर्षांच्या मुलीनेही जीव गमावला. याच दरम्यान, मुलींच्या आई-वडिलांची प्रकृती अद्यापही चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. याप्रकरणी अहमदाबाद महानगरपालिकेच्या अन्न विभागाने तपास सुरू केला आहे.
पिठाचे नमुने तपासणीसाठी पाठवले
अन्न अधिकारी डॉ. तेजस शाह यांच्या माहितीनुसार, पोलिसांच्या उपस्थितीत संबंधित डेअरीतून पिठाचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच चांदखेडा पोलिसांनी गुन्हा नोंदवून मृतदेहांचे शवविच्छेदन केले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
"१०० किलोपेक्षा जास्त पिठाची विक्री"
डेअरी मालक केतन भाई यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्या दिवशी त्यांनी १०० किलोपेक्षा जास्त पिठाची विक्री केली होती आणि इतर कोणत्याही ग्राहकाकडून तक्रार आलेली नाही. त्यांनी असंही सांगितलं की, इतर ग्राहकांशी संपर्क साधला असता त्यांनी हे पीठ खाल्ल्यानंतर कोणताही त्रास झाला नसल्याचं स्पष्ट केलं आहे.