राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 19:16 IST2025-06-17T19:16:25+5:302025-06-17T19:16:44+5:30

अनिता राजने इंदूरच्या सोनम प्रकरणाप्रमाणेच आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीला संपवण्यासाठी २ लाख रुपयांची सुपारी दिली होती.

A repeat of the Raja Raghuvanshi murder case; Goons were called after paying, the wife along with her lover killed her husband! | राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!

राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!

एकीकडे राजा रघुवंशी प्रकरणामुळे देशभरात खळबळ माजलेली असतानाच, आता याच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या ठिकाणी एका पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केली. ८ जून रोजी घडलेली ही घटना तब्बल ८ दिवसांनी उघडकीस आली आहे.

नेमकं काय घडलं?

अलवर जिल्ह्यातील खेरली येथे वीरू जाटव नावाच्या व्यक्तीचा ८ जून रोजी संशयास्पद मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा सामान्य मृत्यू वाटत होता, पण पोलिसांनी केलेल्या सखोल तपासानंतर हे प्रकरण खुनाचे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी वीरूची पत्नी अनिता राज आणि तिचा प्रियकर काशीराम यांना हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिता राजने इंदूरच्या सोनम प्रकरणाप्रमाणेच आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीला संपवण्यासाठी २ लाख रुपयांची सुपारी दिली होती. ८ जून रोजी पहाटे २ वाजता अनिता राजने आपल्या प्रियकर आणि त्याच्या साथीदारांना घरी बोलावले. तिने घराचा दरवाजा उघडा ठेवला, ज्यामुळे मारेकऱ्यांना घरात घुसणे सोपे झाले.

गळा दाबून केली हत्या

आरोपींनी वीरूचा गळा दाबून खून केला. सकाळी अनिताने पतीची तब्येत बिघडल्याचे नाटक केले. कुटुंबीयांनी वीरूला रुग्णालयात नेले, परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी जेव्हा शवविच्छेदन अहवाल पाहिला, तेव्हा वीरूच्या शरीरावर जखमांच्या खुणा आणि तुटलेले दात आढळले, ज्यामुळे हत्येचा संशय बळावला.

प्रियकरासोबत राहण्यासाठी पतीचा काटा काढला

पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला असता, अनिताचे काशीरामशी अनैतिक संबंध असल्याचे समोर आले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, त्यांनी आपला गुन्हा कबूल केला.

चौकशीत असेही उघड झाले की, अनिताने वीरूशी दुसरे लग्न केले होते. तिने तिच्या पहिल्या पतीला सोडून वीरूसोबत लग्न केले होते. आता, काशीरामसोबत राहण्यासाठी तिने वीरूचा खून करण्याचा कट रचला होता. वीरूने १५ दिवसांपूर्वीच आपल्या पहिल्या पत्नीच्या मुलाचे लग्न केले होते.

सीसीटीव्हीने उघड केले सत्य

वीरूचा मोठा भाऊ गब्बर याने वीरूच्या शरीरावर असलेल्या जखमा आणि तुटलेल्या दातांमुळे खुनाचा संशय व्यक्त करत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. कठुमार सीओ कैलाश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली, धीरेंद्र सिंग गुर्जर यांच्या टीमने १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. या फुटेजमुळेच संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.

पोलिसांनी अनिता राज, तिचा प्रियकर काशीराम आणि कॉन्ट्रॅक्ट किलर विश्वेंद्र जाटव यांना अटक केली आहे. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

Web Title: A repeat of the Raja Raghuvanshi murder case; Goons were called after paying, the wife along with her lover killed her husband!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.