ठाण्यात क्रिकेट खेळण्याच्या वादातून टाेळक्याने दुसऱ्या गटातील २० वर्षीय तरुणाची केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 12:45 IST2025-06-03T12:44:50+5:302025-06-03T12:45:22+5:30
हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शिवमचा उपचारापूर्वीच मृत्यू

ठाण्यात क्रिकेट खेळण्याच्या वादातून टाेळक्याने दुसऱ्या गटातील २० वर्षीय तरुणाची केली हत्या
लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: क्रिकेट खेळण्याच्या वादातून एका टाेळक्याने दुसऱ्या गटातील शिवम कराेतिया (वय २०, रा.वागळे इस्टेट, ठाणे) याच्या पाठीच्या उजव्या भागावर वार केले. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शिवमचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, आराेपींचा शाेध घेण्यात येत असल्याची माहिती वागळे इस्टेट पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक शिवाजी गवारी यांनी साेमवारी दिली.
वागळे इस्टेट, साठवाडी भागात सोमवारी सायंकाळी ५ वाजता ज्ञानसाधना कॉलेजजवळ भावेश करोतिया (वय १६) हा मुलांसह रवी शर्मा (१९) याच्याबराेबर क्रिकेट खेळत हाेता. दरम्यान भावेशचा खेळण्यावरून रवीबरोबर वाद झाला. रवीने भावेशला मारहाण केली. या वादानंतर भावेशने कुटुंबीयांच्या आग्रहावरून वाद मिटताही घेतला.
वाद मिटला पण...
वाद मिटल्यानंतर पुन्हा काॅलेजसमोर भावेशचे दोन्ही भाऊ साहील आणि शिवम, तसेच रवीचा मित्र तनिष हेमेंद्र सिंग (रा.सर्व साठेवाडी, ठाणे) यांच्यात वाद झाला. वादातून त्यांच्यात हाणामारीही झाली. त्यामध्ये तनिषने शिवमच्या उजव्या बाजूला चाकू खुपसला. गंभीर जखमी झालेल्या शिवमला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला हाजुरीतील महावीर जैन हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान शिवमचा सायंकाळी ६:४० वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला.