नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 08:22 IST2026-04-09T08:21:58+5:302026-04-09T08:22:30+5:30
मांसाहारास भाग पाडले; धार्मिक भावना दुखावल्याचाही आरोप

नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक: शहरातील एका मल्टिनॅशनल कंपनीच्या कार्यालयात मागील पाच वर्षापासून नोकरीला एकत्र असताना, तेथील सहा पुरुष कर्मचाऱ्यांनी महिला कर्मचाऱ्यांचा वेळोवेळी विनयभंग केला तसेच एका पीडितेला लग्नाचे आश्वासन देत शारीरिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. धार्मिक भावना दुखावल्याचेही काही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली असून, त्यांना न्यायालयाने शुक्रवारपर्यंत (दि.१०) पोलिस कोठडी दिली आहे. गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आयुक्तालयाच्या स्तरावर विशेष तपास पथक (एसआयटी) गठित केले आहे.
नाशिक विनयभंग प्रकरण नेमके काय?
मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत कार्यरत असलेल्या एका मल्टिनॅशनल कंपनीच्या कार्यालयात पीडित महिला, युवतींसह संशयित आरोपी वेगवेगळ्या पदांवर २०२२ सालापासून नोकरीला होते. त्याचठिकाणी पीडितांसोबत आरोपींची ओळख झाली. या ओळखीचा गैरफायदा घेत कार्यालयात काम करताना, बळजबरीने संवाद साधून स्त्री मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे शब्द संवाद वापरून तर कधी शरीराला जाणूनबुजून स्पर्श करत वैयक्तिक आयुष्याबाबत पीडितांसोबत बळजबरीने बोलण्याचा प्रयत्न करत. संशयितांनी विनयभंग केल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे.
एकूण नऊ पीडितांनी फिर्याद दिली असून, त्यावरून मुंबई नाका पोलिस ठाण्यात आठ गुन्हे विनयभंग, धार्मिक भावना दुखविल्याप्रकरणी दाखल करण्यात आले आहेत, तर बला बलात्कार, विनयभंगप्रकरणी एक गुन्हा देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात दाखल असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांनी बुधवारी (दि. ८) आयुक्तालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
मांसाहारास भाग पाडले
पीडितेला शाकाहारी असूनही बळजबरीने मांसाहार खाद्यपदार्थ खाण्यास भाग पाडल्याचाही आरोप करण्यात आला आहे. तसेच, कार्यालयातून सुटी झाल्यानंतर पीडित महिलेचा पाठलाग करत अश्लील शेरेबाजीसुद्धा करण्यात येत होती.
कधी अश्लील भाषा, तर कधी थेट स्पर्श
मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत कार्यरत असलेल्या एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या कार्यालयात पीडित महिला, युवतींसह संशयित आरोपी वेगवेगळ्या पदांवर २०२२पासून नोकरीला होते. संशयित हे ग्रुप लीडर वा तत्सम पदांवर कार्यरत होते. त्याचठिकाणी पीडितांसोबत आरोपींची ओळख झाली. या ओळखीचा गैरफायदा घेत कार्यालयात काम करताना, बळजबरीने संवाद साधून लज्जा उत्पन्न होईल, अशी भाषा वापरणे, तर कधी शरीराला स्पर्श करणे, कधी वैयक्तिक आयुष्याबाबत बळजबरी बोलण्याचा प्रयत्न केला जात होता.
पीडित महिलेचा पाठलाग, शेरेबाजी
संशयितांनी बळजबरीने धार्मिक विषयावर चर्चा करून आक्षेपार्ह वक्तव्य करत भावना दुखाविल्याचाही आरोप पीडितांकडून फिर्यादीमध्ये करण्यात आला आहे. पीडिता शाकाहारी असल्याचे माहीत असतानासुद्धा बळजबरीने मांसाहार खाद्यपदार्थ खाण्यास भाग पाडल्याचाही आरोप करण्यात आला आहे. तसेच, कार्यालयातून सुट्टी झाल्यानंतर पीडित महिलेचा पाठलाग करत अश्लील शेरेबाजीसुद्धा केल्याचे म्हटले आहे.
सहा अटकेत; एकास पुण्यातून अटक
दानिश शेख, तौसिफ अत्तार, निदा खान, रजा मेमन, शाहरूख कुरेशी, शफी शेख यांना अटक करण्यात आली आहे. एकाला पुण्यातून, तर उर्वरित पाचजणांना नाशिक शहरातील वेगवेगळ्या उपनगरांमधून ताब्यात घेतले. संशयित आरोपी दानिश शेख, तौसिफ अत्तार, निदा खान, रजा मेमन, शाहरूख कुरेशी, शफी शेख या सहाजणांविरुद्ध पोलिसांनी विनयभंग, धार्मिक भावना दुखविल्याचा ठपका ठेवला आहे. दरम्यान, पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून संशयित तौसिफ याच्याविरुद्ध देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित करत शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप आहे, असे पोलिसांनी सांगितले. या सहा आरोपींपैकी एक आरोपीला पुण्यातून पोलिसांनी अटक केली, तर उर्वरित पाचजणांना नाशिक शहराच्या वेगवेगळ्या उपनगरांमधून ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे.
पीडित महिलांनी दिलेल्या तक्रारींवरून स्वतंत्रपणे गुन्हे दाखल केले आहेत. एकूण नऊ गुन्ह्यांमध्ये सहा आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला असून, सखोल तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.
-संदीप मिटके, सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा