एका कॉलनं घातला घोळ! खऱ्या IAS अधिकाऱ्यालाच ठरवलं बोगस; कागदपत्रे समोर येताच पोलीस चिडीचूप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 12:34 IST2026-03-18T12:33:56+5:302026-03-18T12:34:22+5:30
१२ मार्चच्या रात्री १० ते १२ पोलीस राहुल कौशिकच्या घरी पोहचले आणि विनाकारण देता त्यांना ताब्यात घेण्यात आले

एका कॉलनं घातला घोळ! खऱ्या IAS अधिकाऱ्यालाच ठरवलं बोगस; कागदपत्रे समोर येताच पोलीस चिडीचूप
मेरठ - उत्तर प्रदेशातील मेरठ येथे बनावट आयएएस अधिकाऱ्याच्या अटकेवरून अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. बोगस IAS अधिकारी असल्याचा आरोपात पकडलेल्या राहुल कौशिक याने स्वत:ला खरा अधिकारी असल्याचा दावा केला आहे. त्यांच्याकडील दस्तावेजामुळे हे संपूर्ण प्रकरण गुंतागुतीचे बनले आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मौन बाळगलं आहे.
१२ मार्चच्या पोलीस कारवाईत राहुल कौशिक याला ताब्यात घेतले होते. राहुल स्वत:ला IAS अधिकारी असल्याचं दाखवत लोकांना धमकावत असे आणि फोन कॉलच्या माध्यमातून अधिकाऱ्यांची दिशाभूल करायचा. पत्रकार परिषद घेत पोलीस अधिकाऱ्यांनी राहुल कौशिकचा बुरखा फाडला आणि ते कुठल्याही शासकीय सेवेत नाहीत असं सांगितले. परंतु या कारवाईनंतर काही तासाने या प्रकरणाला नवं वळण लागले. राहुल कौशिक माध्यमांसमोर आले आणि त्यांनी पोलिसांचा दावा फेटाळून लावला. २००८ साली यूपीएससी परीक्षा पास केली होती. ऑल इंडिया रँकिंग ७२८ आली होती असं राहुलने पत्रकारांना सांगितले.
आपला दावा खरा दाखवण्यासाठी राहुलने अनेक दस्तावेज सादर केले. त्यात भारत सरकारच्या गृह मंत्रालयाशी निगडित ओळख पत्र, ब्यूरो ऑफ पार्लियामेंट्री स्टडीज अँन्ड ट्रेनिंग प्रमाणपत्र, पोस्ट विभागाचे आयडी आणि काही वृत्तपत्रांच्या बातम्यांची कात्रणेही दाखवली. ही कागदपत्रे समोर आणल्यानंतर पोलिसांनी कुठल्याही चौकशीविना एका व्यक्तीला बनावट जाहीर केले का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अचानक घरी आले पोलीस
१२ मार्चच्या रात्री १० ते १२ पोलीस राहुल कौशिकच्या घरी पोहचले आणि विनाकारण देता त्यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्याच्याशी गैरवर्तन केले. मोबाईल फोन जप्त केला आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत पोलीस ठाण्यात बसवून ठेवल्याचा आरोप आहे. या घटनेची माहिती राहुलच्या कुटुंबाला दिली तेव्हा त्याच्या घरातील सदस्य पोलीस ठाण्यात पोहचले. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पार पाडून राहुल याला घरी नेण्यात आले. माहितीनुसार, २०१७-१८ साली राहुलवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यातून त्याला निलंबित करण्यात आले होते. राहुल या निर्णयाविरोधात कायदेशीर लढा देत आहे. सध्या हे प्रकरण सेट्रंल एडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्यूनलकडे प्रलंबित आहे.
फोन कॉलने सुरू झाला वाद
राहुल कौशिकला अटक करण्याचा वाद एका फोन कॉलने सुरू झाला. राहुलने एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला फोन केला होता. या दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर पोलिसांनी राहुल कौशिकला अटक केली. या प्रकरणात राहुल कौशिकची मानसिक स्थितीही समोर आली आहे. नोकरी गेल्यानंतर त्याच्यावर मानसिक दडपण आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याच्यावर औषधोपचार सुरू आहेत. राहुल कौशिकला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उभे राहिले आहेत. कुठल्याही चौकशीविना एखाद्याला बनावट अधिकारी घोषित करणे योग्य आहे का? ही कारवाई घाईघाईने का करण्यात आली? यासारख्या विविध प्रश्नांच्या उत्तरांचा शोध राहुलचे वकील घेत आहेत.