इंदौर-उज्जैन हादरले! दोन आश्रमांत १७ चिमुरड्यांचा बळी; हायकोर्टाने प्रशासनाला धरले धारेवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 15:00 IST2026-02-27T14:55:00+5:302026-02-27T15:00:26+5:30
मध्य प्रदेशातील दोन आश्रमांमध्ये दिव्यांग मुलांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे.

इंदौर-उज्जैन हादरले! दोन आश्रमांत १७ चिमुरड्यांचा बळी; हायकोर्टाने प्रशासनाला धरले धारेवर
MP Ashram Deaths:मध्य प्रदेशातील इंदौर आणि उज्जैनमधील युग पुरुष आणि सेवाधाम आश्रमात मागील काही महिन्यांत तब्बल १७ दिव्यांग मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदौर खंडपीठाने स्वत:हून दखल घेतली असून, राज्याचे मुख्य सचिव, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
नेमके प्रकरण काय?
२०२४ च्या जून आणि जुलै महिन्यात इंदूरमधील युग पुरुष आश्रमात १० मुलांचा मृत्यू झाला होता, तर ६० हून अधिक मुले आजारी पडली होती. त्यावेळी प्रशासनाने श्वास घेण्यास त्रास हे मृत्यूचे कारण सांगितले होते. या घटनेनंतर इंदौरचे तत्कालीन जिल्हाधिकारी आशिष सिंह यांनी या आश्रमाची मान्यता रद्द केली आणि तेथील ८६ दिव्यांग मुलांना २५ डिसेंबर २०२४ रोजी उज्जैनच्या अंकित सेवाधाम आश्रमात हलवण्याचे आदेश दिले होते.
स्थलांतरानंतरही मृत्यूचे सत्र सुरूच
मुलांच्या सुरक्षेसाठी त्यांना उज्जैनला हलवण्यात आले खरे, पण तिथेही मृत्यूचे तांडव थांबले नाही. गेल्या १४ महिन्यांत उज्जैनच्या आश्रमात आणखी ७ मुलांचा मृत्यू झाला, ज्यामुळे एकूण मृतांची संख्या १७ वर पोहोचली आहे. मृत मुलांचे वय १० ते १८ वर्षांच्या दरम्यान आहे.
वैद्यकीय अहवालातील धक्कादायक खुलासे
चरक भवन रुग्णालयाचे आरएमओ डॉ. चिन्मय चिंचोळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आश्रमातून आणलेली अनेक मुले आधीच मृत होती. उपचारादरम्यान दगावलेल्या मुलांमध्ये तीव्र ॲनिमिया आणि कुपोषणाची लक्षणे आढळली. ही मुले इतकी अशक्त होती की त्यांना साधे उभे राहणे किंवा चालणेही अशक्य होते.
आश्रम संचालकाचा दावा
सेवाधाम आश्रमाचे संचालक सुधीर भाई गोयल यांनी सांगितले की, इंदौरहून पाठवण्यात आलेली मुले आधीच अत्यंत गंभीर अवस्थेत होती. त्यांना श्वास घेण्याचे त्रास आणि फिट्स येण्याचे आजार होते. सध्या या आश्रमात २५० हून अधिक निराधार मुले असून, त्यातील ५० जणांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. दरम्यान, प्रशासनाने आता हा आश्रम बंद केला आहे.