जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणूक; छ. संभाजीनगरात ‘वंचित’- काँग्रेसमध्ये बोलणी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 18:15 IST2026-01-19T18:15:24+5:302026-01-19T18:15:54+5:30
महापालिका निवडणुकीत काँग्रेसपेक्षा ‘वंचित’चे जास्त उमेदवार निवडून आले आहेत.

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणूक; छ. संभाजीनगरात ‘वंचित’- काँग्रेसमध्ये बोलणी सुरू
छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी व काँग्रेस यांच्यात युतीची बोलणी फिसकटली होती. मात्र, जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकीत या दोन्ही पक्षांत पुन्हा युतीची बोलणी सुरू झाली असून, सोमवारी (दि. १९ ) दुपारपर्यंतचा ‘अल्टिमेटम’ ‘वंचित’ने काँग्रेसला दिला आहे. अन्यथा ‘वंचित’ने स्वबळावर सर्व जागा लढण्याची तयारी केली आहे, असे या पक्षाचे जिल्हाध्यक्ष योगेश बन यांनी सांगितले.
बन यांनी सांगितले की, महापालिका निवडणुकीत काँग्रेसपेक्षा ‘वंचित’चे जास्त उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे जि. प. व पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसकडून युतीचा प्रस्ताव आला आहे. काँग्रेसचे नेते नामदेव पवार यांनी अगोदर कन्नड येथे तालुका अध्यक्षांसोबत युतीसंदर्भात चर्चा केली. त्यानंतर त्यांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर यांनी ‘वंचित’च्या पश्चिम विभागाचे जिल्हाध्यक्ष रूपचंद गाडेकर यांना युतीबाबत चर्चेसाठी बोलावले. त्यानुसार नवनिर्वाचित नगरसेवक अमित भुईगळ, योगेश बन, पूर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर तायडे व पश्चिम विभागाचे जिल्हाध्यक्ष रूपचंद गाडेकर हे जिल्हा बँकेत डोणगावकर यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी गेले होते. त्यांच्याकडे ‘वंचित’ने जि. प. व पं. स. निवडणुकीत २५ टक्के जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यांनी सोमवारी दुपारपर्यंतची वेळ मागितली आहे.
केंद्रीय कार्यकारणी सदस्य तथा जिल्हा प्रभारी अरुंधती शिरसाट, शहराध्यक्ष पंकज बनसोडे, जिल्हा महासचिव अंजन साळवे, रामदास वाघमारे यांनी क्रांतीचौकातील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये शनिवारी जिल्हा परिषदेसाठी २२, तर पंचायत समितीसाठी ३५ इच्छुकांनी मुलाखती दिल्या. रविवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत जि.प.साठी ८२, तर पंचायत समितीसाठी १७० उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले.
आघाडीची वाट न बघता उमेदवारी दाखल करा
आघाडीची वाट न बघता कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम यांनी रविवारी कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले. यावेळी दौलत खरात, किशोर थोरात, विजय मगरे, बाळकृष्ण इंगळे, संजय ठोकळ, राकेश पंडित, अरविंद अवचरमल, दिलीप पाडमुख, लक्ष्मण हिवराळे आदी स्थानिक प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. भाजप मित्रपक्षांना संपवण्याचे काम करीत आहे. शिंदेसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उदाहरण ताजे आहे. याही निवडणुकीत भाजपकडून रिपाइंला जागा मिळतील, अशी अपेक्षा नाही, असे कदम म्हणाले.