भालचंद्र मुणगेकर : प्राचार्यांच्या कार्यशाळेत मार्गदर्शन
औरंगाबाद : शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांनी, महिलांचे प्रश्न महिलांनी मांडायचे. मागासवर्गीयांच्या प्रश्नांवर त्यांनीच भांडायचे अशा विचारांच्या व कृतीच्या चौकटीत अडकलेला भारतीय समाज ही चौकट केव्हा मोडणार? असा सवाल माजी खासदार, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मनुष्यबळ विकास केंद्रात बुधवारी प्राचार्यांच्या कार्यशाळेत त्यांनी ऑनलाईन संवाद साधला. कार्यशाळेचे उद्घाटन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते झाले. डॉ. एन. एन. बंदेला, डॉ. मोहम्मद अब्दुल राफे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. डॉ. येवले यांनी ‘उच्च शिक्षणातील बदलते प्रवाह,’ तर डॉ. मुणगेकर यांनी ‘नवीन शैक्षणिक धोरण’ यावर मार्गदर्शन केले.
डॉ. मुणगेकर म्हणाले, समता, बंधुता, सर्वधर्म समभाव व सामाजिक या चतु:सूत्रीवर ७० वर्षांपूर्वी आपण प्रजासत्ताक स्थापन केले. स्वातंत्र्यापूर्वी पाहिलेले स्वप्न साकार होईल, असा आशावाद होता. तथापि आजही हे स्वप्न पूर्ण होऊ शकलेले नाही. शिक्षणावर खर्च कमी होत आहे; तेव्हा गुणवत्ता व सर्वांगीण विकास कसा साधणार? यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात १ लाख ३ हजार कोटी रुपयांवरून शिक्षणासाठीची तरतूद १४ हजार कोटींवर आणण्यात आली. एक बाजूला सहकारी संस्था व शिक्षणाचे बाजारीकरण होत असताना सरकारी तरतूद कमी होत आहे, ही बाब चिंताजनक आहे. कुलगुरू येवले यांनी कोविडनंतरचे शिक्षण, संशोधनाचा दर्जा, स्किल कोर्सेस यांसह विविध विषयांचा ऊहापोह केला. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील, डॉ. डी. डी. गायकवाड, प्र-कुलगुरू डॉ. शाम शिरसाट यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. डॉ. एन. एन. बंदेला यांनी प्रास्ताविक, तर डॉ. मोहम्मद अब्दुल राफे यांनी सूत्रसंचालन केले.