प्रतीक्षा यादी वाढतेय; पण विशेष रेल्वेंचा पत्ताच नाही, उन्हाळी सुट्यांत गर्दीतून प्रवासाची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 17:17 IST2026-03-23T17:17:12+5:302026-03-23T17:17:50+5:30
यंदा मार्चअखेर येत असतानाही विशेष रेल्वेंसंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही.

प्रतीक्षा यादी वाढतेय; पण विशेष रेल्वेंचा पत्ताच नाही, उन्हाळी सुट्यांत गर्दीतून प्रवासाची वेळ
छत्रपती संभाजीनगर : उन्हाळी सुट्यांच्या तोंडावर रेल्वे प्रवासासाठी प्रवाशांची लगबग वाढली असताना विविध मार्गांवरील रेल्वेंचे आरक्षण झपाट्याने फुल्ल होत आहे. मात्र, या वाढत्या प्रवासी ताणाचा विचार करूनही दक्षिण मध्य रेल्वेकडून छत्रपती संभाजीनगरमार्गे अद्याप उन्हाळी विशेष रेल्वे जाहीर करण्याकडे दुर्लक्षच होत आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात प्रवाशांना बहुधा तुडुंब गर्दीतूनच प्रवास करावा लागेल.
दरवर्षी एप्रिल-मे महिन्यांत रेल्वे प्रवाशांची संख्या वाढते. यंदा मार्चअखेर येत असतानाही विशेष रेल्वेंसंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही. विशेषतः मुंबई, नांदेड, हैदराबादकडे जाणाऱ्या रेल्वेंमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढली आहे. परिणामी, अनेक प्रवाशांचे आरक्षण वेटिंगमध्ये अडकले आहे. विद्यार्थ्यांच्या सुट्या आणि पर्यटनामुळे पुढील काही आठवड्यांत प्रवाशांची संख्या आणखी वाढणार असल्याने विशेष रेल्वेंची मागणी होत आहे.
या रेल्वेंचे आरक्षण ‘वेटिंग’वर
मुंबईकडे जाणारी राज्यराणी, वंदे भारत एक्स्प्रेस, जनशताब्दी, तपोवन, नंदीग्राम, देवगिरी एक्स्प्रेसचे आरक्षण आताच ‘वेटिंग’वर गेले आहे. सचखंड एक्स्प्रेसचेही आरक्षण भरले आहे.
विशेष रेल्वेंचा विसर
दरवर्षी विविध ठिकाणांसाठी अनेक उन्हाळी विशेष रेल्वे सुरू केल्या जातात; परंतु यावर्षी आजपर्यंत नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर शहरातून एकही विशेष रेल्वे सुरू करण्यात आलेली नाही. नांदेड विभागाने परभणी-मनमाडमार्गे नांदेड-बिकानेर एक्स्प्रेस सुरू करणे अत्यावश्यक आहे. उन्हाळी विशेष रेल्वे म्हणून नांदेड-पनवेल एक्स्प्रेस, नांदेड-कोल्हापूर साप्ताहिक एक्स्प्रेस, नांदेड-अयोध्या साप्ताहिक एक्स्प्रेस सुरू करावी. छत्रपती संभाजीनगर ते नागपूर दरम्यान एकही विशेष रेल्वे उपलब्ध नाही.
-दयानंद दीक्षित, सदस्य, मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघ, सदस्य, परभणी
कोल्हापूरपर्यंत विस्तार करा
उन्हाळ्याच्या सुटीत प्रवाशांच्या सुविधेसाठी गोरखपूर, जोधपूर, कोलकाता, नागपूरमार्गे बुद्धगयेसाठी विशेष रेल्वे सोडली पाहिजे. तपोवन एक्स्प्रेसच्या धर्तीवर मुंबईसाठी सुपरफास्ट पॅसेंजर सोडली पाहिजे. नांदेड-हडपसर एक्स्प्रेसचा विस्तार कोल्हापूरपर्यंत केला पाहिजे.
- संतोषकुमार सोमाणी, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी सेना