शेतकरी कर्जमाफीसाठी उद्धवसेनेने रोखला महावीर चौक; सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणला
By बापू सोळुंके | Updated: June 12, 2025 17:37 IST2025-06-12T17:36:29+5:302025-06-12T17:37:40+5:30
शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासह अन्य मागण्यासाठी उद्धवसेनेच्यावतीने गेल्या काही दिवसांपासून क्या हुआ तेरा वादा हे आंदोलन करण्यात येत आहे.

शेतकरी कर्जमाफीसाठी उद्धवसेनेने रोखला महावीर चौक; सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणला
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी यासाठी तसेच महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनाचा विसर पडल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी उद्धवसेनेच्यावतीने गुुरुवारी सकाळी शहरातील महावीर चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासह अन्य मागण्यासाठी उद्धवसेनेच्यावतीने गेल्या काही दिवसांपासून क्या हुआ तेरा वादा हे आंदोलन करण्यात येत आहे. यांतर्गत बुधवारी शहरात ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. आज महावीर चौक(बाबा पेट्रोल पंप )येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. उद्धवसेनेचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे...शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा मिळालाच पाहिजे...लबाड सरकार मुर्दाबाद.. आश्वासन देऊन पळ काढणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा जोरदार घोषणा देत आंदोलकांनी काही काळ रस्ता रोखून धरला. यामुळे चौकात आलेली वाहने काही काळ एकाच ठिकाणी थांबली होती.
शहरातील मुख्य चौकच अडविल्याने पोलिसांनी आ.दानवे यांच्यासह सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले. क्रांती चौक पोलीस स्टेशनात नेल्यानंतर त्यांच्याविरोधात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. या आंदोलनात महानगरप्रमुख राजू वैद्य, अरविंद धिवर, संतोष जेजुरकर, अशोक शिंदे, विजय वाघमारे, संतोष खेंडके, विठ्ठल बदर पाटील, चंद्रकांत गवई, दिग्विजय शेरखाने, वीरभद्र गादगे, सचिन तायडे, संजय मोटे, शंकरराव ठोंबरे, विष्णू जाधव, विशाल खंडागळे, बापू कवळे, जयसिंग होलीये, प्रमोद ठेंगडे, संजय बापू पवार, रवी गायकवाड, रामेश्वर कोरडे, सुनिता आऊलवार, सुनिता देव, दुर्गा भाटी, आशा दातार, सुकन्या भोसले आदींनी सहभाग नोंदविला.
१० कलमी योजना राबवाव्यात
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी. राज्य सरकारला शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचा विसर पडल्याने लबाड सरकारला शेतकऱ्यांचा आक्रोश लक्षात यावा. तसेच विधानसभा निवडणूक दरम्यान आश्वासन दिलेल्या १० कलमी योजना राबविण्यात याव्या, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली. उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर यांनी गुलाबी फेटा, धोतर आणि कुर्ता घालून शेतकऱ्यांचा आसूड पुस्तकांचे लेखक व दिवंगत थोर समाजसेवक महात्मा फुले यांच्या पेहरावात या आंदोलनात सहभागी झाले होते.