पैठणमध्ये हळहळ! नाथषष्ठी सोहळ्याला आलेल्या वारकऱ्याचा गोदावरी पात्रात बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 19:06 IST2026-03-11T19:06:03+5:302026-03-11T19:06:33+5:30
अंघोळीसाठी गेले अन् परतलेच नाहीत; दोन तासांच्या शोधमोहिमेनंतर वारकऱ्याचा मृतदेह सापडला

पैठणमध्ये हळहळ! नाथषष्ठी सोहळ्याला आलेल्या वारकऱ्याचा गोदावरी पात्रात बुडून मृत्यू
पैठण: येथे सुरू असलेल्या नाथषष्ठी सोहळ्यादरम्यान मंगळवारी सकाळी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. गोदावरी पात्रात स्नानासाठी उतरलेल्या एका ६० वर्षीय वारकऱ्याचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. बाबूराव रुद्राजी बगळे (रा. हळदा, ता. सिल्लोड) असे मृत वारकऱ्याचे नाव आहे.
अशी घडली घटना
हळदा येथील श्रीक्षेत्र मुक्ताई संस्थानच्या दिंडीसोबत बाबूराव बगळे हे रविवारी पैठणमध्ये दाखल झाले होते. मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास ते नाथ मंदिराजवळील गोदावरी पात्रात स्नानासाठी गेले. मात्र, पात्रातील खोलीचा अंदाज न आल्याने ते खोल पाण्यात ओढले गेले. सोबत असलेल्या त्यांच्या पत्नी अंजना यांनी बाबूराव दिसत नसल्याचे वारकऱ्यांना सांगितले, त्यानंतर तातडीने शोधमोहीम हाती घेण्यात आली.
२ तासांच्या शोधमोहिमेनंतर मृतदेह हाती
घटनेची माहिती मिळताच छत्रपती संभाजीनगरचे मुख्य अग्निशमन अधिकारी छत्रपती केकान यांच्या मार्गदर्शनाखाली पथक घटनास्थळी पोहोचले. विजय राठोड, सचिन शिंदे आणि त्यांच्या टीमने सुमारे दोन तास शोध घेतला. सकाळी १० वाजेच्या सुमारास बगळे यांचा मृतदेह शोधण्यात यश आले. मंगळवारी सायंकाळी शोकाकुल वातावरणात हळदा (ता. सिल्लोड) येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.