पर्यटकांनो लक्षात असू द्या, गौताळा अभयारण्यात १ जुलै ते १५ सप्टेंबरपर्यंत प्रवेशबंदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 20:13 IST2025-06-25T19:44:29+5:302025-06-25T20:13:26+5:30
पावसाळ्यात जैवविविधतेच्या रक्षणासाठी वन विभागाची खबरदारी

पर्यटकांनो लक्षात असू द्या, गौताळा अभयारण्यात १ जुलै ते १५ सप्टेंबरपर्यंत प्रवेशबंदी
छत्रपती संभाजीनगर : गौताळा अभयारण्यात १ जुलै ते १५ सप्टेंबर या कालावधीत पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आली असून, या कालावधीत पर्यटक व वाहनांचा वावर बंद राहणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात बिजांकुरांची वाढ, नव्या रोपांची संवर्धन प्रक्रिया आणि वन्य जिवांच्या सुरक्षिततेसाठी ही खबरदारी वन विभागाच्या वतीने घेतली जात आहे.
वर्षा ऋतूत नाजूक रोपे, बिजांकुर तसेच जंगलातील झाडांना आणि जैवविविधतेला धोका निर्माण होतो. त्याचबरोबर पर्यटकांच्या वाहतुकीमुळे जंगलातील नैसर्गिक परिसंस्था बिघडू शकते. या पार्श्वभूमीवर वन विभागाने पर्यटकांना अभयारण्यात येण्यास प्रतिबंध घातला असून, उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
तपासणी होणार
चेक नाक्यावर ड्रायव्हर तपासणी अभियान राबवण्यात येणार असून, हिवरखेडा आणि पुरणवाडी या चेक पोस्टवर वन कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असेल. संबंधित ठिकाणी आवश्यक सूचना देण्यात आलेल्या असून, या निर्णयासंदर्भातील अधिकृत अधिसूचना लवकरच प्रसिद्ध होणार असल्याची माहिती गौताळा अभयारण्याचे विभागीय वन अधिकारी मोहन नाईकवाडी यांनी दिली.