वेळत निदान अन् काळजीने काचबिंदू होईल ठीक; दुर्लक्ष केल्याने येईल कायमचे अंधत्व
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 14:20 IST2025-04-01T14:19:54+5:302025-04-01T14:20:17+5:30
वेळेत निदान आणि योग्य काळजी घेतल्यास हा गंभीर आजार टाळता येऊ शकतो.

वेळत निदान अन् काळजीने काचबिंदू होईल ठीक; दुर्लक्ष केल्याने येईल कायमचे अंधत्व
छत्रपती संभाजीनगर : सर्वांना मोतीबिंदू माहीत आहेच. त्याचप्रमाणे डोळ्यांना काचबिंदूही होत असतो. काचबिंदू हा असा आजार आहे, जो सुरुवातीला कोणतीही लक्षणे न देता हळूहळू दृष्टी कमी करतो आणि उपचार घेतले नाहीत तर कायमचे अंधत्व येऊ शकते. दुर्दैवाने, अनेकांना या आजाराची वेळेत जाणीव होत नाही. वेळेत निदान आणि योग्य काळजी घेतल्यास हा गंभीर आजार टाळता येऊ शकतो.
महिन्याला २,५०० रुग्णांची तपासणी
जिल्हा सामान्य रुग्णालयातील ओपीडीत येणाऱ्या नेत्ररुग्णांची संख्या मोठी आहे. महिनाभरात जवळपास २ हजार ५०० रुग्णांची ओपीडीत तपासणी होते.
दोन जणांना काचबिंदू
ओपीडीत महिनाभरात येणाऱ्या रुग्णांमध्ये एक ते दोन रुग्णांना काचबिंदू आढळतो. काचबिंदूसाठी औषधी ड्राॅप, लेझर, काचबिंदू शस्त्रक्रिया महत्त्वाची ठरते.
डोळ्यांची तपासणी कधी करायला हवी ?
वर्षे ४० पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींनी दर दोन वर्षांनी डोळ्यांची तपासणी करावी, तर ६० वर्षांवरील ज्येष्ठांनी दरवर्षी डोळ्यांची तपासणी करणे आवश्यक आहे. कुटुंबात काचबिंदूचा इतिहास असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित तपासणी करावी.
डोळ्यांची काळजी कशी घ्याल ?
संतुलित आहार घ्यावा. व्हिटॅमिन ए, सी, आणि ई युक्त आहार घ्यावा. रक्तदाब आणि मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करावा. तीव्र प्रकाश किंवा स्क्रीनसमोर काम करताना संरक्षणात्मक चष्मा वापरावा. धूम्रपानामुळे डोळ्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे धूम्रपान टाळावे.
...तर येऊ शकते कायमचे अंधत्व
काचबिंदूची लक्षणे सुरुवातीला दिसून येत नाहीत. त्यामुळे नियमित तपासणी अत्यंत आवश्यक आहे. उपचार न केल्यास हा आजार दृष्टी कमी होणे किंवा पूर्ण अंधत्वास कारणीभूत ठरू शकतो.
चाळिशीनंतर तपासणी करावी
चाळिशीनंतर प्रत्येकाने नेत्रतज्ज्ञांकडून डोळ्यांची तपासणी केली पाहिजे. मधुमेह, रक्तदाब व इतर आजार, ज्यात दाह होतो, अशा रुग्णांना नियमित तपासणी, वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक असते.
- डॉ. संतोष काळे, वरिष्ठ नेत्रशल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय.