मशागती आटोपल्या, बियाणांच्या दरात १० टक्क्यांनी वाढ झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 18:20 IST2025-06-18T17:44:19+5:302025-06-18T18:20:23+5:30

शासनाने हमीभावात किरकोळ वाढ केली, तर बियाण्यांच्या दरात १० टक्क्यांची वाढ केल्याने शेतकऱ्यांत नाराजी

Tillage is over, farmers are in financial trouble due to 10 percent increase in seed prices! | मशागती आटोपल्या, बियाणांच्या दरात १० टक्क्यांनी वाढ झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी!

मशागती आटोपल्या, बियाणांच्या दरात १० टक्क्यांनी वाढ झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी!

गंगापूर : तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी मशागतीची कामे जवळपास पूर्ण केली असून, पेरणीची तयारी सुरू झाली आहे. मात्र, यावर्षी बियाण्यांच्या दरात १० टक्क्यांनी वाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. परिणामी, खरीप पिकांचे नियोजन बिघडत असून शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत.

अलीकडच्या काळात शेतकऱ्यांना कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. यामध्येच उत्पादनासाठी लागणारे बियाणे, खते, औषधे, मजुरी आदींचा खर्च वाढला असतानाच बाजारात अपेक्षित दर मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आता शेती नकोशी होत आहे. दुसरीकडे शासनाने हमीभावात किरकोळ वाढ केली, तर बियाण्यांच्या दरात १० टक्क्यांची वाढ केल्याने शेतकऱ्यांच्या नाराजीचे वातावरण पसरले आहे. त्यातच पावसाचा मागमूस नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये अधिकच भर पडली असून पेरणीचे नियोजन पार कोलमडले आहे.

मजुरी वाढली, कर्ज मात्र वेळेवर नाही...
शेतीसाठी लागणाऱ्या मजुरांची उपलब्धता कमी होत असून दर दिवसागणिक मजुरीचे दर वाढत आहेत. काही ठिकाणी मजुरी देऊनही मजूर मिळत नाहीत, अशी अवस्था आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मजुरांच्या वेळापत्रकानुसार, शेतीच्या मशागतीचे नियोजन करावे लागत आहे. दुसरीकडे, शेतकऱ्यांना वेळेवर बँकेकडून पीककर्जही मिळत नसल्यामुळे आर्थिक नियोजन कोलमडत आहे.

खर्च वाढला, उत्पादनाची मात्र खात्री नाही...
शेतकरी महागड्या आणि नामांकित कंपन्यांचे बियाणे अधिकृत कृषी केंद्रातून खरेदी करतात, तरीही अनेक वेळा उत्पादन निघाल्यावर बाजार व्यवस्थेकडून दर पाडले जातात. परिणामी, शेतकऱ्यांची फसवणूक होते. अशा अनुभवामुळे शेतकरी मानसिक तणावात जातात आणि पुन्हा कर्जाच्या विळख्यात अडकतात.

अवकाळी बरसल्यानंतर मान्सून दीर्घ रजेवर...
मे महिन्यात अवकाळी पाऊस जोरदार बरसला. या पावसामुळे काही शेतकऱ्यांच्या कापणीला आलेल्या शेतीचे, कापून ठेवलेल्या चाऱ्याचे नुकसान केले, तर काही शेतकऱ्यांच्या आशा पावसाने पल्लवित केल्या. दुसरीकडे शेतीच्या मशागतीला लागलेल्या शेतकऱ्यांची कामे आता पावसाने विश्रांती घेतल्याने खोळंबली आहेत. गेल्या १० दिवसांपासून पावसाने रजा घेतल्याने शेतकरी मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत. पाऊस नियमित झाल्यानंतरच पेरणी करण्यास कृषी विभागाने शेतकऱ्यांना सांगितले आहे.

Web Title: Tillage is over, farmers are in financial trouble due to 10 percent increase in seed prices!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.