"जेंव्हा सत्तेत होते तेंव्हा का नाही जमलं?"; कर्जमाफीवरून शिरसाटांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 18:58 IST2026-03-07T18:56:58+5:302026-03-07T18:58:00+5:30
संजय शिरसाट यांचा ठाकरेंवर प्रहार! "तुमचा सातबारा कोरा कधी झाला?"

"जेंव्हा सत्तेत होते तेंव्हा का नाही जमलं?"; कर्जमाफीवरून शिरसाटांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल
छत्रपती संभाजीनगर: राज्य सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या ऐतिहासिक शेतकरी कर्जमाफीचा फायदा १५ सप्टेंबरपासून प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मिळण्यास सुरुवात होईल, अशी घोषणा मंत्री संजय शिरसाट यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार महिनाभरात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना शिरसाट म्हणाले की, "उद्धव ठाकरे सातबारा कोरा करण्याच्या गप्पा मारत होते, पण त्यांनी तसे केले असते तर आज पुन्हा कर्जमाफीची गरजच भासली नसती. ज्यांनी प्रशासन चालवले त्यांना योजनेचा अभ्यास करावा लागतो हे समजले नाही, हे दुर्दैवी आहे. त्यांना जे जमले नाही, ते महायुती सरकारने करून दाखवले आहे."
विधिमंडळातील उपस्थितीवरून टोला
संजय राऊत यांनी ठाकरेंचा आवाज बुलंद असल्याच्या दाव्यावर शिरसाट यांनी खोचक टिप्पणी केली. "बुलंद आवाज असण्यासाठी मंत्रालयात बसावे लागते. अधिवेशनात केवळ एक-दोन दिवस येऊन माध्यमांसमोर बोलल्याने जनतेचे प्रश्न सुटत नाहीत," असे ते म्हणाले.
मुंबई मनपा: मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर श्वेतपत्रिका काढलीच पाहिजे, जेणेकरून मागील काळात काय झाले ते जनतेसमोर येईल.
रोहित पवार: रोहित पवारांच्या कारखान्यामुळे अपघात झाला की नाही, हे अहवालातून स्पष्ट होईल. हा विषय वैयक्तिक पातळीवर नेणे चुकीचे आहे.
शिखर बँक घोटाळा: शिखर समितीने क्लीन चिट दिली असली तरी, रोहित पवारांच्या अर्जावर अंतिम निर्णय उच्च न्यायालयच घेईल.