नांदेड विभागाकडून प्रस्तावच नाही; मग वंदे भारत एक्स्प्रेसचा नांदेडपर्यंत विस्तार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 19:51 IST2025-06-17T19:51:01+5:302025-06-17T19:51:37+5:30

‘दमरे’कडून प्रस्तावच नाही, नवीन रेल्वे देण्याऐवजी रेल्वे बोर्डाचा ‘शाॅर्टकट’

There is no proposal from Nanded division; then why extend Vande Bharat Express to Nanded? | नांदेड विभागाकडून प्रस्तावच नाही; मग वंदे भारत एक्स्प्रेसचा नांदेडपर्यंत विस्तार का?

नांदेड विभागाकडून प्रस्तावच नाही; मग वंदे भारत एक्स्प्रेसचा नांदेडपर्यंत विस्तार का?

छत्रपती संभाजीनगर : वंदे भारत एक्स्प्रेसचा नांदेडपर्यंत विस्तारीकरण करण्यासाठीचा कोणताही प्रस्ताव दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून देण्यात आला नव्हता. विस्तारीकरणाचा हा निर्णय रेल्वे बोर्डाकडूनच घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नेमके विस्तारीकरण का करण्यात आले, असा प्रश्न प्रवाशांना पडत आहे. नांदेडहून नवीन वंदे भारत एक्स्प्रेस देण्याऐवजी, आहे त्या रेल्वेचा विस्तार करण्याचा ‘शाॅर्टकट’ रेल्वे बोर्डाने घेतल्याचीही ओरड होत आहे.

जालना-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस नांदेडपर्यंत नेली जात आहे. याचा सर्वाधिक फटका छत्रपती संभाजीनगरला बसणार आहे. ही रेल्वे छत्रपती संभाजीनगरहून ८० टक्के प्रवाशांनी भरून जात असताना अचानक तिचा विस्तार नांदेडपर्यंत करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला. छत्रपती संभाजीनगरहून प्रवाशांचा प्रतिसाद असताना आणि ‘दमरे’च्या नांदेड विभागाकडून विस्तारासंदर्भात कोणताही प्रस्ताव नसताना रेल्वे पळविण्याच्या प्रकाराविषयी संताप व्यक्त होत आहे.

नव्या रेल्वेची मागणी
नांदेडहून मुंबईसाठी वंदे भारत एक्स्प्रेसची मागणी केली जात होती. ही मागणी पूर्ण करण्यासाठी नवीन रेल्वे सुरू करणे शक्य आहे. मुंबईस जाणाऱ्या रेल्वेची गरज पाहता किमान नांदेड ते दादरपर्यंतही नवी रेल्वे देणे शक्य आहे; परंतु नवी रेल्वे सुरू करण्याऐवीज आहे ती रेल्वे नांदेडपर्यंत नेण्याचा सोपा पर्याय निवडल्याची चर्चा आहे. यातून नांदेड येथील प्रवाशांची सुविधा होईल; परंतु याचा फटका छत्रपती संभाजीनगरकरांना बसणार आहे.

काय म्हणाले रेल्वे अधिकारी?
प्रश्न : वंदे भारत एक्स्प्रेसचा नांदेडपर्यंत विस्तार करण्यासंदर्भात विभागाकडून काही प्रस्ताव दिला होता का?
प्रदीप कामले : विभागाकडून असा कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. हा रेल्वे बोर्डाचा निर्णय आहे.

प्रश्न : प्रस्ताव नसताना विस्तार का होत आहे?
प्रदीप कामले : आमच्याकडे संघटनांकडून मागणी येते, ते आम्ही वर कळवितो. त्यावर वरिष्ठ पातळीवर निर्णय होतो.

प्रश्न : वंदे भारत एक्स्प्रेस नांदेडहून कधीपासून धावेल?
प्रदीप कामले : याविषयी सध्या काही माहिती नाही. कार्यालयाला अधिकृत काही माहिती प्राप्त नाही.
(प्रदीप कामले, विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) नांदेड विभाग, ‘दमरे’)

नवीन रेल्वे सुरू करण्याची मागणी करणार....
वंदे भारत ही रेल्वे सध्या जालना येथून मुंबईसाठी आहे. आता नांदेडपासून सुरू होणार असे वृत्त येत आहे. हे शहर औद्योगिक शहर आहे. त्यामुळे वंदे भारत ही नवीन रेल्वे येथून सोडावी. जर ते शक्य नसेल तर येथून ७५ लोकं बसतील एवढ्या क्षमतेची बोगी येथून जोडावी, अशी मागणी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे करण्यासाठी या आठवड्यात त्यांना दिल्लीत भेटणार आहे.
- डॉ. भागवत कराड, खासदार

Web Title: There is no proposal from Nanded division; then why extend Vande Bharat Express to Nanded?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.