शेतकऱ्यांना वाटलं पिकात लपलेल्या बिबट्याने त्यांना पाहिलं नाही,ते माघारी फिरले आणि...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2022 21:09 IST2022-03-16T21:09:26+5:302022-03-16T21:09:50+5:30
तलाववाडीत बिबट्याच्या हल्ल्यात दोन जण जखमी

शेतकऱ्यांना वाटलं पिकात लपलेल्या बिबट्याने त्यांना पाहिलं नाही,ते माघारी फिरले आणि...
करंजखेड (औरंगाबाद) : बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन जण जखमी झाले असून, एक कुत्रा ठार झाला आहे. ही घटना बुधवारी सकाळी कन्नड तालुक्यातील तलाववाडी येथे घडली. यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
करंजखेडजवळ असलेल्या तलाववाडी येथे बुधवारी सकाळी ११ वाजेदरम्यान शेतकरी गजानन श्यामलाल राजपूत हे जनावरांसाठी बाजरीचा हिरवा कडबा आणण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांना त्याठिकाणी बिबट्या लपलेला आढळला. त्यांनी लागलीच शेताशेजारील राहुल नारायण राजपूत यांना बोलावून घेतले. ते धावतच तेथे आले. दोघांनी तो बिबट्याच असल्याची खात्री केली. यानंतर त्यांनी तातडीने मोबाइलमध्ये फोटो काढून तेथून काढता पाय घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेवढ्यात बिबट्याने अचानक दोघांवरही हल्ला चढविला. दोघांनी जिवाच्या आकांताने आरडाओरड केल्याने ग्रामस्थांनी धाव घेतली. हे पाहून बिबट्याने जंगलात धूम ठोकली. तत्पूर्वी, त्याने एका कुत्र्यालाही ठार मारले. यात राहुल राजपूत व गजानन राजपूत यांच्या पायाला जखमा झाल्या आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.
अधिकारी तातडीने घटनास्थळी...
येथील ग्रामस्थ व शिवसेना जिल्हा उपप्रमुख अवचितराव वळवळे यांनी घटनेची माहिती वन विभागाला कळविली. कन्नड वनक्षेत्रपाल ए.बी. गायके, वन मंडळ अधिकारी नितीन घोडके, वनरक्षक आर.सी. म्हस्के, सी.एस. मुंजाळ यांनी घटनास्थळाला भेट दिली. या घटनेने घाबरलेल्या गावकऱ्यांना धीर दिला, तसेच शेतकऱ्यांनी किमान दोन ते तीन दिवस त्या भागाकडे न जाण्याचा सल्ला दिला. एकटे बाहेर न पडणे, मोठ्याने आवाज करणे, फटाके फोडणे व धूर करण्याचा शेतकऱ्यांना त्यांनी सल्ला दिला.