'ज्या दिवशी आंबेडकरवादाची अनुभूती होईल, आयुष्य बदलेल'; सुमित चौहान यांचे परखड मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 19:58 IST2026-03-31T19:57:08+5:302026-03-31T19:58:56+5:30
आंबेडकरवादाची जाणीव झाली तर आयुष्य उजळेल! ‘नागसेन फेस्टिव्हल’चा आज समारोप

'ज्या दिवशी आंबेडकरवादाची अनुभूती होईल, आयुष्य बदलेल'; सुमित चौहान यांचे परखड मत
छत्रपती संभाजीनगर : आंबेडकरवादी आंदोलन चालविण्याची आज समाजाला गरज आहे. ज्या दिवशी युवकांना आंबेडकरवादाची अनुभूती होईल, त्या दिवसापासून आपले संपूर्ण जीवन बदलेल, असे प्रतिपादन दिल्ली येथील युवा पत्रकार सुमित चौहान यांनी केले.
‘नागसेन फेस्टिव्हल’चा विचारांचा जागर रविवारपासून सुरू झाला. सोमवारी दुसऱ्या दिवशी फेस्टिव्हलमध्ये डिजिटल मीडिया अर्थात यूट्यूब, वेब पोर्टल, पॉडकास्ट यांच्या माध्यमातून देशातील शैक्षणिक व सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करणाऱ्या युवा पत्रकारांचा ‘नव माध्यमातील आंबेडकरी पत्रकारितेचे वर्तमान आणि भविष्य’ या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. या परिसंवादात सुमित चौहान (दिल्ली), साहिल वाल्मीकी (नोएडा), हितेश कुमार (दिल्ली), राज असरोडकर (उल्हासनगर) आणि मनीष सागर (मनाली) सहभागी झाले होते.
ऐनवेळी सायंकाळी पाऊस सुरू झाल्यामुळे या फेस्टिव्हलचे कार्यक्रम लगतच्या रंगमंदिरात घेण्यात आले. परिसंवादात बोलताना सुमित चौहान म्हणाले, बहुजन मीडियात काम करणाऱ्या युवकांचा उत्साह वाढवा. बहुजन मीडियाला प्रोत्साहन द्या. नेहमी एक प्रश्न विचारला जातो की, आंबेडकरी पत्रकारितेसाठी आपणास प्रेरणा कोठून मिळाली. तेव्हा मी सांगतो, महात्मा फुले, आंबेडकर, कांशिराम, पेरियार यांच्यापासून मला पत्रकारितेची प्रेरणा मिळते. हा वारसा मला तथागत गौतम बुद्धांपासून मिळाला. माझे पूर्वज व्यवस्थेला प्रश्नच विचारत होते. संत रविदास, संत कबीर यांची वाणी, त्यांचे दोहे म्हणजे व्यवस्थेला विचारलेले प्रश्न होते. आंबेडकरवादी पत्रकारितेची परंपरा अनेक शतकापासून सुरू आहे.
यावेळी उर्वरित मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले.
या परिसंवादापूर्वी ‘एल्गार समतेचा’ हे कवी संमेलन पार पडले. यात ‘कौन जात हो भाई’ या प्रसिद्ध कवितेचे रचनाकार युवा कवी बच्चालाल उन्मेष (बनारस), डॉ. अनिकेत खांडकर (मुंबई), गिरीश खोब्रागडे (यवतमाळ) आणि गणेश खरात यांनी सादर केलेल्या विद्रोही कवितांनी उपस्थितांना अंतर्मुख केले. सचिन निकम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर सिद्धार्थ मोकळे यांनी प्रास्ताविक केले.
फेस्टिव्हलमध्ये आज अभिनेेते मिलिंद शिंदे
फेस्टिव्हलच्या समारोप समारंभात रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त बेजवाडा विल्सन हे ‘तंत्रज्ञानाचा बुरखा, मॅन्युअल स्कॅव्हेंजिंगचा चेहरा : भारताचं जात वास्तव’ या विषयावर भाष्य करतील. सिनेअभिनेते मिलिंद शिंदे हे अध्यक्षस्थानी असणार आहेत. त्यानंतर ‘जल्लोष भीमजयंतीचा’ या विशेष सत्रात प्रांजल सुरडकर, रिदम रिव्होल्यूशन संघाचा फ्लॅश मॉब, विपीन तातड आणि टीम यांचे रॅप सादरीकरण होईल.