२८ टीसी अन् २५ रेल्वेत अचानक तपासणी; एकाच दिवशी विनातिकीट ५०० प्रवाशांना दणका, दंड वसूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 15:24 IST2026-03-30T15:23:30+5:302026-03-30T15:24:30+5:30
विनातिकीट प्रवास पडला महागात! रेल्वेला 'चुना' लावणाऱ्या ५०० प्रवाशांना नांदेड विभागाने शिकवला धडा

२८ टीसी अन् २५ रेल्वेत अचानक तपासणी; एकाच दिवशी विनातिकीट ५०० प्रवाशांना दणका, दंड वसूल
छत्रपती संभाजीनगर: रेल्वे प्रवासादरम्यान विनातिकीट प्रवास करून रेल्वेला 'चुना' लावणाऱ्या प्रवाशांना नांदेड विभागाने मोठा दणका दिला आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने राबविलेल्या एका विशेष तिकीट तपासणी मोहिमेत अवघ्या एका दिवसात तब्बल ५०० प्रकरणांचा पर्दाफाश झाला. या कारवाईत रेल्वे प्रशासनाने ३ लाख ४२ हजार ५८० रुपयांचा दंड वसूल केला असून, 'काही होणार नाही' या बेफिकीर वृत्तीला चपराक दिली आहे.
नांदेड विभागातील २८ तिकीट तपासनिसांनी २५ वेगवेगळ्या रेल्वेंमध्ये अचानक तपासणी करून ही मोठी कारवाई यशस्वी केली.
एकाच दिवसात ४४९ विनातिकीट प्रवासी पकडले
दक्षिण मध्य रेल्वेने २६ मार्च रोजी सकाळी ६ ते सायंकाळी ८ या कालावधीत ही विशेष मोहीम राबवली. या दरम्यान ४४९ प्रवासी विनातिकीट प्रवास करताना रंगेहाथ पकडले गेले. त्यांच्याकडून २ लाख १४ हजार ४१० रुपये भाडे आणि १ लाख १५ हजार १९० रुपये दंड, असा एकूण मोठा महसूल वसूल करण्यात आला. विनातिकीट प्रवासासोबतच अनियमित प्रवास करणाऱ्या १५ जणांवरही कारवाई करण्यात आली, ज्यांच्याकडून ७ हजार ४८० रुपये दंड आकारला गेला.
सामान बुक न करणाऱ्यांनाही बसला फटका
केवळ तिकीटच नाही, तर रेल्वेच्या नियमांचे उल्लंघन करून सामान (Luggage) बुक न करता प्रवास करणाऱ्या ३६ प्रवाशांनाही या मोहिमेत दंड भरावा लागला. त्यांच्याकडून ५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. प्रवासादरम्यान नियमांचे उल्लंघन करणे रेल्वे कायद्यानुसार दंडनीय अपराध असल्याचे प्रशासनाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.
प्रवाशांना रेल्वेचे कळकळीचे आवाहन
"प्रवाशांनी नेहमी वैध तिकीट काढूनच प्रवास करावा. तसेच सोबत असलेले सामान नियमानुसार बुक करावे," असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वेने केले आहे. सुरक्षित, सुलभ आणि आरामदायी प्रवासासाठी प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, अन्यथा अशा धडक मोहिमा भविष्यातही सुरूच राहतील, असा इशारा रेल्वे विभागाने दिला आहे.