राजकीय पक्ष काढण्यापेक्षा उद्योग सुरू करा; राजरत्न आंबेडकरांचा आंबेडकरी समूहाला हितोपदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 14:40 IST2020-11-27T14:36:48+5:302020-11-27T14:40:48+5:30
आंबेडकरी समूहाला सामाजिक व आर्थिक प्रगतीच्या लढाईची गरज आहे.

राजकीय पक्ष काढण्यापेक्षा उद्योग सुरू करा; राजरत्न आंबेडकरांचा आंबेडकरी समूहाला हितोपदेश
औरंगाबाद : राजकीय पक्ष काढण्यापेक्षा एखादा उद्योग सुरू करा. शिक्षण संस्था काढा. आता आम्हाला राजकीय आरक्षणही नको. कारण ते देण्यामागचा हेतूच साध्य होताना दिसत नाही. आज आंबेडकरी समूहाला सामाजिक व आर्थिक प्रगतीच्या लढाईची गरज आहे. यापुढे त्यावरच लक्ष केंद्रित करा, असा हितोपदेश गुरुवारी येथे राजरत्न आंबेडकर यांनी केला.
समता सैनिक दलातर्फे मौलाना आझाद संशोधन केंद्रात आयोजित संविधान गौरव दिन सोहळ्यात ते बोलत होते. सुभेदार मेजर बाजीराव सोनुने अध्यक्षस्थानी होते. राजरत्न आंबेडकर म्हणाले, संविधानाचे प्रत्येक पान रोज पाडलं जातंय. संविधानाच्या पहिल्या कलमापासून ते ३९५ व्या कलमापर्यंत रोज पायमल्ली होत आहे. संविधानाची ५० टक्के अंमलबजावणी केली गेली असती, तर हा देश समृद्ध आणि संपन्न झाला असता.
प्राचार्य नामदेव सोनवणे, डॉ. सुधीर चक्रे, गणपती पाखरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.विलास शिरसाट, कारभारी त्रिभुवन, मंगल पगारे, रेखा राऊत, प्रवीण साळवे, भीमराव घोरपडे, शंकर म्हस्के आदींनी परिश्रम घेतले.