पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाला गती देणार
By Admin | Updated: April 20, 2015 00:31 IST2015-04-20T00:21:06+5:302015-04-20T00:31:53+5:30
लातूर : पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाला गती देण्यासोबतच लातूरला दीडशे विद्यार्थ्यांची एमबीबीएस प्रवेशासाठीची कायमस्वरूपी मान्यता मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू.

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाला गती देणार
लातूर : पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाला गती देण्यासोबतच लातूरला दीडशे विद्यार्थ्यांची एमबीबीएस प्रवेशासाठीची कायमस्वरूपी मान्यता मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू. तसेच बायपास, अॅन्जियोग्राफी, डायलेसीस सुविधा लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपलब्ध करून देण्यासाठी आपण आग्रहाने प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक तथा उस्मानाबाद जिल्ह्यातील खामगाव येथील मराठवाड्याचे भूमिपुत्र डॉ. प्रवीण शिनगारे यांनी येथे केले.
डॉ. प्रवीण शिनगारे एका खाजगी कामानिमित्त आले असता लातूर येथील ‘लोकमत’ कार्यालयास त्यांनी रविवारी सायंकाळी भेट दिली. यावेळी बोलताना डॉ. शिनगारे म्हणाले, रुग्णसेवेला प्रथम प्राधान्य आहे. मराठवाड्यातील रुग्णांना मराठवाड्यातच उपचार मिळावे, ही माझी आग्रही भूमिका आहे. औरंगाबाद येथे सुमारे ५० हजार कोटी रुपयांचे कॅन्सर हॉस्पिटल सुरू आहे. आगामी काळात मराठवाड्यासाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल निर्माण करण्याचा आपला प्रयत्न राहील, असेही ते म्हणाले.
साथ रोगांच्या आजारात मृत्यूदर घटविण्यासाठी अतिदक्षता विभागावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने अतिदक्षता विभागात सुविधा वाढविण्याचे धोरण सुरू आहे. सध्या शंभर खाटांपैकी पाच खाटा अतिदक्षता विभागासाठी असतात. त्यात वाढ करण्यात येणार असल्याचे डॉ. शिनगारे यांनी सांगितले. त्यासाठी लागणारा उपकरणांचा खर्च जिल्हा वार्षिक विकास योजनेतून होईल.
लातूर येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल निर्माण होण्यासाठी जागेची कमतरता भासत आहे. सर्वच शासकीय रुग्णालयांत वाढीव मनुष्यबळ देण्याचा प्रयत्न आरोग्य विभाग करणार आहे. शासकीय रुग्णालयातील एमआरआय व सिटीस्कॅन सेवा अद्ययावत करू. खाटांची संख्या वाढवू, असेही ते म्हणाले. नवजात शिशु अर्भकाचा मृत्यूदर घटविण्यात महाराष्ट्राने जनजागृती केली आहे. राज्यातील ३५ पैकी २२ जिल्ह्यांत नवजात शिशु अर्भक अतिदक्षता विभाग स्थापन करण्यात आला आहे. पूर्वी रुग्णालयात होणारे ६० टक्के बाळंतपण आता ९० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.
स्वाईन फ्लू, बर्ल्ड फ्ल्यू, चिकुन गुनियासारखे साथ आजार नियंत्रणात ठेवण्यात अन्य राज्यांच्या तुलनेने महाराष्ट्राला यश आले आहे. प्रत्येक रुग्णालयाच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधींचा सहभाग असलेले अभ्यागत मंडळ स्थापन करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. याबाबतची अंमलबजावणी सुरू असल्याचेही डॉ. प्रवीण शिनगारे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)