छ. संभाजीनगरातील सिंचन भवनमधील कार्यालयांचे स्थलांतर सुरू, शेतकऱ्यांची गैरसोय होणार
By बापू सोळुंके | Updated: March 23, 2026 20:37 IST2026-03-23T20:37:18+5:302026-03-23T20:37:37+5:30
एकाच छताखालील कार्यालये आता विखुरणार; 'सिंचन भवन'चा केंद्रबिंदू हलविण्याच्या हालचाली

छ. संभाजीनगरातील सिंचन भवनमधील कार्यालयांचे स्थलांतर सुरू, शेतकऱ्यांची गैरसोय होणार
छत्रपती संभाजीनगर : शासनाच्या विविध विभागांची कार्यालये नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी एकाच छताखाली आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे मात्र जलसंपदा विभागाच्या अधिपत्याखालील जालना रोडवरील सिंचन भवनातील विविध कार्यालये मात्र विखुरण्यास सुरुवात झाली आहे. या निर्णयामुळे शेतकरी व पाणी वापर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांनाही मोठ्या अडचणी येऊ शकतात.
सिंचन भवनात गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक, मुख्य अभियंता (जलसंपदा), अधीक्षक अभियंता (गुणनियंत्रण व दक्षता), कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग कार्यालय, कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग क्र.२ कार्यालय, उपविभागीय अभियंता जलविज्ञान प्रकल्प कार्यालय, उपविभागीय अभियंता वाकोद, उपविभागीय (भूसुधार) अभियंता कार्यालय यासह अन्य कार्यालये होती. मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पांशी संबंधित सर्व कामांसाठी शेतकरी, अधिकारी आणि संस्थांचे प्रतिनिधी याच ठिकाणी येत. त्यामुळे सिंचन भवन मराठवाड्यातील पाणीप्रश्नासाठी केंद्रबिंदू होता.
मात्र, आता गोदावरी महामंडळाच्या कार्यकारी संचालकांचे कार्यालय वगळता इतर कार्यालये अन्यत्र हलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता कार्यालय ‘कडा’ परिसरात, जिल्हा पाटबंधारे विभागाचे कार्यालय स्नेहनगर येथे गेले आहे. मुख्य अभियंत्यांचे कार्यालय नांदेड येथे हलविण्यात येत असून, अधीक्षक अभियंता (गुणनियंत्रण व दक्षता) कार्यालय स्नेहनगर येथे जाणार आहे. इतर उपविभागीय कार्यालयेही टप्प्याटप्प्याने हलविणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
यामुळे एकाच ठिकाणी उपलब्ध असलेले अधिकारी, कर्मचारी विखुरले जाणार आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या कामासाठी वेगवेगळ्या ठिकाणी धावपळ करावी लागेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांची कार्यालये एकत्र असल्याने कनिष्ठ अधिकाऱ्यांवरील नियंत्रणही कमी होण्याची शक्यता आहे.
स्थलांतरावर लाखोंची उधळपट्टी?
सिंचन भवनातील कार्यालये अन्यत्र हलविण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च केला जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. गरज नसताना एकत्रित व्यवस्था मोडून काढून शेतकऱ्यांची गैरसोय करून सार्वजनिक पैशांचा अपव्यय का केला जात आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
इतर विभाग मात्र एकत्रीकरणाच्या दिशेने
महसूल विभागाचे प्रशासकीय संकुल लेबर कॉलनी येथे उभारले जात आहे, तर क्रांती चौकात सहकार भवन, महावीर चौकात आरोग्य संकुल, खोकडपुरा येथे सामाजिक न्याय भवन आणि शहानूरवाडी येथे कृषी विभागाची कार्यालये एकत्रित करण्यात आली आहेत. याउलट सिंचन विभागाची कार्यालये विखुरली जात असल्याने धोरणातील विसंगती स्पष्ट होत आहे.